संगीत प्रेमी ग्रुपचा प्रथम वर्धापन दिन उत्साहात
संगीत क्षेत्रातील कलाकारांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध
सातारा
“साताऱ्याचे कलाकार पुण्याच्या कलाकारांसमोर कधीही कमी पडत नाहीत. संगीत क्षेत्रात एकमेकांना मदत व सहकार्य करण्याची भावना महत्त्वाची असून, संगीत प्रेमी ग्रुपच्या माध्यमातून कलाकारांना नवनवीन संधी उपलब्ध होत आहेत. आगामी काळात या ग्रुपचे पुण्यातही कार्यक्रम व्हावेत, यासाठी आपण निश्चित सहकार्य करू,” असा विश्वास दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष शिरीष चिटणीस यांनी व्यक्त केला.
सातारा शहर व परिसरातील संगीतप्रेमी गायकांचे हक्काचे व्यासपीठ म्हणून कार्यरत असलेल्या ‘संगीत प्रेमी’ ग्रुपचा प्रथम वर्धापन दिन रविवारी (दि. १६) कलावाणिज्य सांस्कृतिक भवन, कोटेश्वर मैदानासमोर, राधिका टॉकीजजवळ येथे उत्साहात साजरा झाला. यावेळी ते बोलत होते.कार्यक्रमास चित्रपट व संगीत समीक्षक डॉ सारिका देशपांडे यांच्यासह संगीत प्रेमीचे संस्थापक विनय कुलकर्णी, प्रमोद लोंढे व राजेंद्र पाटील उपस्थित होते.
शिरीष चिटणीस म्हणाले पुढे , “संगीत प्रेमी ग्रुपचा पहिला वर्धापन दिन साजरा होत असताना मला विशेष आनंद होत आहे. ग्रामीण भागाचा संगीत वाढविण्यात आणि त्याचा प्रसार करण्यात मोठा सहभाग राहिला आहे. भजनी मंडळांमध्ये कोणतीही पदवी नसतानाही उत्तम गायन करणारे आणि विविध रागांची जाण असणारे अनेक कलाकार आपल्याला पाहायला मिळतात.”
साहित्यिक ना. सी. फडके यांच्या संगीतप्रेमाचा संदर्भ देताना त्यांनी सांगितले की, “ना. सी. फडके हे कथा, कादंबरीकार व लेखक म्हणून प्रसिद्ध होते; मात्र ते तितकेच संगीतप्रेमी होते. ते तमाशांच्या फडांमध्ये, छोट्या कार्यक्रमांमध्ये जाऊन गाणी ऐकत आणि त्यावर लिखाण करीत. त्यांच्या या संगीतविषयक लेखनातून संगीताबद्दलची त्यांची आस्था दिसून येते.”
संगीत प्रेमी ग्रुपच्या तीन संस्थापकांमधील एकोप्याचे कौतुक करताना चिटणीस म्हणाले, “दोन माणसे एकत्र आली की अनेकदा मतभेद होतात आणि गट टिकत नाहीत. मात्र संगीत प्रेमी ग्रुपचे संस्थापक विनय कुलकर्णी, प्रमोद लोंढे आणि राजेंद्र पाटील हे एक वर्ष पूर्ण होऊनही अतिशय एकोप्याने काम करीत आहेत. त्यांच्या या एकोप्यासाठी टाळ्या वाजवल्या पाहिजेत. त्यांच्या एकत्रित प्रयत्नांतूनच कलाकारांसाठी नवीन संधी निर्माण होणार आहेत.”
“संगीत क्षेत्रात एकमेकांना मदत करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. संगीत प्रेमी ग्रुपही याच भावनेतून प्रामाणिकपणे काम करीत आहे. या ग्रुपमधील तिन्ही संस्थापक अत्यंत नम्र असून सर्वांना मदत व सहकार्य करण्याची त्यांची भूमिका आहे,” असेही त्यांनी सांगितले.
संगीताच्या माध्यमातून समाजातील लोक एकत्र येणे, संवाद वाढणे आणि परस्परांना सहकार्य करणे शक्य असल्याचे सांगून चिटणीस यांनी ‘म्युझिक थेरपी’चे महत्त्वही अधोरेखित केले. “पुढील काळात कराओके व संगीताचे कार्यक्रम सातत्याने वाढले पाहिजेत. संगीताच्या माध्यमातून सामाजिक सलोखा आणि आनंद वाढण्यास मदत होते,” असे ते म्हणाले.
साताऱ्यातील कलाकारांच्या गुणवत्तेचे कौतुक करताना त्यांनी सांगितले की, “पुण्यातील कलाकारांसमोर सातारकर कलाकार कधीही कमी पडत नाहीत. आगामी काळात कलाकारांना मोठ्या प्रमाणात संधी मिळेल. नगरपालिका अथवा अन्य कोणत्याही माध्यमातून आवश्यक ते सहकार्य करण्याचा प्रयत्न केला जाईल.”
यावेळी प्रमुख उपस्थित डॉ. सारिका देशपांडे यांनी संगीत प्रेमी ग्रुपच्या कलाकारांचे कौतुक केले. “संगीत प्रेमीच्या कलाकारांनी आतापर्यंत सातत्याने दर्जेदार कार्यक्रम सादर केले आहेत. गाणे गाता येणे छान आहे, सुंदर गाता येणे त्याहून सुंदर; मात्र गाणे गुणगुणण्याची इच्छा निर्माण होणे हेही तितकेच सुंदर आहे,” असे त्यांनी सांगितले. वर्धापन दिनानिमित्त करण्यात आलेली सुंदर सजावट आणि कार्यक्रमाचे नियोजन यांचेही त्यांनी कौतुक केले.
वर्धापन दिनाच्या मैफलीत अपर्णा गायकवाड, स्नेहल चिंचणे, रमिजा सय्यद, रागिणी शिकलगार, स्वाती जांभळे, प्रीती लिमये, तरन्नुम सय्यद, सुजाता नावंधर, सलीमचाचा, अजय घोरपडे, राहुल शेंडे, सलामअली बागवान, महेश साळुंखे, चारुहास सप्रे, आनंद शहा, प्रदीप पवार, कदिर सय्यद, डॉ. बारटक्के व संजय खराटे आदी गायक कलाकारांनी सहभाग घेत संगीतप्रेमींना सुरेल मेजवानी दिली.

