डिजिटल अरेस्टपासून सावध राहा
फसवणूक टाळण्यासाठी उपाय नक्की करा
मुंबई
ग्राहकांची फसवणूक करण्यासाठी ऑनलाईन किंवा सायबर भामटे नवीन शक्कल लढवत असतात. असाच एक प्रकार हल्ली भारतात प्रचलित आहे, तो म्हणजे डिजिटल अरेस्ट. या डिजिटल अरेस्टपासून सावध राहायला हवे आणि फसवणूक टाळण्यासाठी उपाय करावेत
या प्रकारच्या फसवणुकीत सायबर भामटे तुमच्याशी संपर्क साधून ते एखाद्या सरकारी संस्थेचे कर्मचारी असल्याचं भासवतात.तुमच्याकडून गंभीर चूक किंवा गुन्हा घडल्याची धमकी तुम्हाला देत तुम्हाला चौकशीच्या नावाखाली संगणकासमोर काही तास बसवून ठेवतात. तुमची चौकशी केल्याचं भासवतात आणि तुमच्यावरील दडपण वाढून तुमच्याकडून सक्तीने ऑनलाईन पद्धतीने पैसे काढून घेतात.
संगणक वापरण्याची सवय नसलेल्या ज्येष्ठ नागरिकांना याचा जास्त फटका बसत आहे. तुमच्यावर आयकर विभागाची नोटीस बजावली जात आहे, तुमच्या बँक खात्यातून खूप मोठी रक्कम चुकीच्या मार्गाने हस्तांतरीत झाली आहे आणि त्यासाठी आम्ही तुमची चौकशी करणार आहोत, असे फोन तुम्हाला आले तर घाबरून जाऊ नका, उलट सावध व्हा
पोलीस, सक्तवसुली संचालनालय, गुन्हे इन्वेषण शाखा, आयात शुल्क विभाग अशा कुठल्याही कार्यालयातून फोन आला आणि तुम्ही गुन्हा केल्याचं त्यांनी सांगितलं तर घाबरून जाऊ नका. आधी समोरच्या व्यक्तीची माहिती विचारा. त्यांच्याकडे चौकशीसाठी काही ठोस पुरावे आहेत का, ते पाहा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी सांगितलं म्हणून कुठलंही ऑनलाईन ॲप डाऊनलोड करू नका
असे घोटाळे टाळण्यासाठी काय करावे
१. आधारचा बायोमेट्रिक डेटा सुरक्षेसाठी लॉक म्हणजे ऑनलाईन पद्धतीने बंद करा. तो सगळ्यांना थेट दिसता कामा नये.
२. त्रयस्थ, अनोळखी लोकांनी ॲप किंवा प्रोग्राम डाऊनलोड करायला सांगितला तर जाणकारांकडून माहिती करून घेतल्याशिवाय तो डाऊनलोड करू नका.
३. घरी एखादी व्यक्ती आजारी असल्यामुळे रुग्णालयात असेल, घरातील जवळच्या व्यक्ती मरण पावली असेल तर अशा वेळी आपण भावनिक दृष्ट्या कमजोर असतो. अशा लोकांना हे भामटे टारगेट करतात. तुमची वैयक्तिक माहिती कुठेही अनोळखी ठिकाणी उघड करू नका आणि अशी प्रसंगी घोटाळ्यांपासूनही सावध राहा.
४. कुठलाही क्यू आर कोड माहिती करून घेतल्याशिवाय स्कॅन करू नका. पैसे तुमच्या खात्यात जमा होण्यासाठी कधीही क्यू आर कोड स्कॅन करावा लागत नाही. पैसे भरताना करावा लागतो. अनेकदा इथंही फसगत होते.
५. कुणीही फोन करून तुमच्या नावे चुकीने पैसे हस्तांतरित झाल्याचं सांगितलं असेल तर आधी झालेल्या व्यवहाराची खात्री करून घ्या. खोटे एसएमएस, ईमेल पाठवून तुम्हाला फसवण्याचा तो कट असू शकतो.
६. तुम्हाला आलेली एसएमएस, ईमेल, वेबसाईटची लिंक लगेच उघडू नका. ती सुरक्षित आणि खरी असल्याची खात्री जाणकार व्यक्तीकडून करून घ्या
७. सायबर गुन्हयांसाठी १९८३ ही हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे. भारतभर या क्रमांकावर संपर्क साधता येऊ शकतो. गरज पडल्यास त्याची मदत घ्या

