सुबराव कदम ज्युनिअर कॉलेजचे बारावी परीक्षेत उल्लेखनीय यश
विज्ञान शाखेचा 100% निकाल, विद्यार्थ्यांची उज्वल यशाची परंपरा कायम
सातारा :
यशोदा शिक्षण संस्थेच्या लोकनेते सुबराव कदम ज्युनिअर कॉलेजने बारावी बोर्ड परीक्षेत पुन्हा एकदा उल्लेखनीय यश संपादन करत उज्ज्वल निकालाची परंपरा कायम राखली आहे. यंदा विज्ञान शाखेचा १०० टक्के निकाल लागला असून विद्यार्थ्यांच्या यशामुळे संस्थेचे नाव उंचावले आहे.
विज्ञान शाखेत आदिती नितीन धुमाळ हिने ८८.३३ टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला.ईशा सचिन शहा हिने ८७.३३ टक्के गुणांसह द्वितीय, तर मृणाल विजय बर्गे हिने ८५.५० टक्के गुणांसह तृतीय क्रमांक मिळवला. या तिघींनीही उत्कृष्ट कामगिरी करत कॉलेजच्या निकालात मोलाचा वाटा उचलला.
कला शाखेत संस्कृती तानाजी जाधव हिने ७२ टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक मिळवला. पायल विक्रम वाघमारे हिने द्वितीय, तर युवराज महादेव पवार यांनी तृतीय क्रमांक पटकावला. या विद्यार्थ्यांनीही आपल्या मेहनतीच्या जोरावर चांगले यश संपादन केले.

वाणिज्य शाखेत तेजस्वी चंद्रकांत कांबळे हिने ७१.६७ टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक मिळवला. श्रेया उदयसिंह जाधव हिने ७१.०० टक्के गुणांसह द्वितीय, तर ऋतुजा संतोष रासकर हिने ६६.५० टक्के गुणांसह तृतीय क्रमांक मिळवला. या विद्यार्थ्यांच्या यशामुळे वाणिज्य शाखेचाही निकाल समाधानकारक ठरला.
या यशामागे यशोदा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष प्रा. डॉ. दशरथ सगरे आणि उपाध्यक्ष प्रा. डॉ. अजिंक्य सगरे यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच प्राचार्य, मुख्याध्यापक आणि सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांसाठी विशेष मेहनत घेतल्यामुळे हा उत्कृष्ट निकाल शक्य झाला. विद्यार्थ्यांनीही सातत्यपूर्ण अभ्यास आणि प्रामाणिक प्रयत्नांच्या जोरावर यश संपादन केले.
यावेळी बोलताना प्रा. डॉ. दशरथ सगरे यांनी सांगितले की, “विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यांच्यातील समन्वय हेच यशाचे खरे गमक आहे. सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांमुळेच हा उल्लेखनीय निकाल लागला आहे. विद्यार्थ्यांनी यश मिळवताना शिस्त, मेहनत आणि सातत्य यांचा अवलंब केला पाहिजे.” त्यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

