सातारा,पुणे जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट
राज्यात आजही मुसळधार पावसाचा इशारा
मुंबई
हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार राज्याच्या विविध भागात सध्या मुसळधार पाऊस कोसळत आहे. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार राज्यात आजही पावसाचा जोर कायम राहणार आहे. आज राज्यातील काही भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
आज रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग,पुणे आणि सातारा जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर मुंबईसह ठाणे जिल्ह्याला पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्याचबरोबर विदर्भातील काही जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. गडचिरोली, चंद्रपूर आणि गोंदिया या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच उत्तर महाराष्ट्रात देखील पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
मागील तीन ते चार दिवसापासून राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस सुरु आहे. या पावासामुळं नदी नाले दुथढी भरुन वाहत आहेत. चांगल्या पावसामुळं धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ झाल्यानं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
यावर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीपासूनच पावसाने उत्तम साथ दिली आहे. याच कारणामुळे लातूर जिल्ह्यात शंभर टक्के पेरणी झाली आहे. उत्तम उगवण क्षमता असल्यामुळे पीकही चांगली आली होती. मात्र, मागील सात आठ दिवसापासून सातत्याने होणारा पाऊस आणि सूर्यदर्शनाच्या अभावामुळं खरिपातली सोयाबीन मूग उडीद यासारखी पिके आता पिवळी पडत आहेत. शेतशिवारामध्ये साचलेलं पाण्याला निचरा मिळत नाही. त्यातच सतत होणारा पाऊस यामुळे पिके पाण्याखाली गेली आहे. अशी स्थिती आणखीन दोन ते तीन दिवस राहिल्यास शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
