भारतीयांचा मोबाईलवर नुसता टाईमपास
निम्म्याहून अधिक लोकांकडून फक्त मनोरंजनासाठी वापर
नवी दिल्ली
सध्याच्या जमान्यात मोबाईल हा जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. आजच्या घडीला देशात 1.2 अब्ज लोकांकडे मोबाईल आहे. यापैकी 71 कोटी लोकांकडे स्मार्टफोन आहेत. असे असले तरी यातील निम्म्याहून अधिक लोक मोबाईल फक्त मनोरंजनासाठी वापरतात.त्यांना ई-मेल करता येत नाही की कॉपीपेस्ट करता येत नाही. अशा लोकांचे प्रमाण 56.2 टक्के आहे. नॅशनल सँपल सर्वेक्षणातून ही धक्कादायक बाब समोर आलेय.
संगणक साक्षरतेबाबतही ग्रामीण व शहरी लोकांचे ज्ञान कमी असल्याचे दिसून आलेय. सर्वेक्षणानुसार, संगणक साक्षर असलेले लोक चंदिगढ ( 41.8 टक्के) येथे आहेत. दुसऱया स्थानी दिल्ली 38.9 टक्के आहे. छत्तीसगढमध्ये तर परिस्थिती फार बिकट आहे. तिथे 95.1 टक्के लोकसंख्येला ई-मेल करता येत नाही. ही अत्यंत आश्चर्यकारक बाब समोर आली आहे.
त्रिपुरा, छत्तीसगढ, बिहार, मणिपूर, ओडिशा, झारखंड, आसा, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश येथे संगणक साक्षरतेबाबत निव्वळ आनंदच आहे. या राज्यांत ई-मेल न करता येण्याचे प्रमाण 90 टक्क्यांहून अधिक आहे. मोबाईलचा वापर मोठय़ा प्रमाणावर मनोरंजनासाठी केला जातो. वेबसिरीजने तर अनकांना अक्षरश: वेड लावले आहे. मोबाईलमध्ये अनेक मनोरंजनात्मक अॅप डाऊनलोड केली जातात. जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मोबाईलचा वापर मनोरंजनासाठी केला जातो. हल्ली क्रीकेटचे सामनेही मोबाईलवरच पाहिले जातात. घरी टीव्ही असूनही अनेकजण मोबाईलवरच व्यस्त असतात. अशी माहिती एका अहवालातून उघड झाली आहे.84 टक्के जणांना ई-मेलसोबत फाईल कशी अटॅच करायची हेच जमत नाही. 87 टक्के जणांना संगणकात नवीन सॉफ्टवेअर कसे इन्स्टॉल करायचे ते माहीत नाही.
संगणक साक्षरता अशी आहे चंदिगढ 41.8 टक्के, दिल्ली 38.9 टक्के, नागालँड 38.6 टक्के, लक्षद्वीप 34.2 टक्के, पुद्दुचेरी 31.4 टक्के, गोवा 29.9टक्के, केरळ 27.2 टक्के, दीव-दमण 25.7 टक्के, सिक्कीम 24.4 टक्के, दादरा-नगर हवेली 23 टक्के
