बँकाना सेवा पुरवणाऱ्या संस्थेवर मोठा सायबर हल्ला
३०० बँकांची पेमेंट सिस्टम तात्पुरती बंद
नवी दिल्ली
भारतीय बँकांवर मोठा सायबर हल्ला झाला असून देशातील मोठ्या पेमेंट नेटवर्कपासून जवळपास ३०० छोट्या बँकांना वेगळं करण्यात आले आहे सायबर हल्ल्यानंतर कोणत्याही संभाव्य धोक्यापासून रोखलं जावं यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे या बँकांना टेक्निकल सेवा पुरवणाऱ्या कंपनीवर हा सायबर हल्ला झालाय. त्यामुळे या बँकांची पेमेंट सिस्टीम तात्पुरती बंद झाली आहे.
‘सी-एज टेक्नॉलॉजीज’ नावाच्या कंपनीवर हा सायबर हल्ला झाला. ही कंपनी देशभरातील छोट्या बँकांना बँकिंग तंत्रज्ञान प्रणाली पुरवते. रॉयटर्सने सी-एज टेक्नॉलॉजीजला यासंदर्भात ई मेलद्वारे विचारणा केली. परंतु त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही.
नॅशनल पेमेंटकॉर्पोरेशन ऑफ इंडिया ही पेमेंट सिस्टीमवर देखरेख ठेवणारी संस्था आहे. एनपीसीआयनं बुधवारी रात्री एक सार्वजनिक माहिती जारी केली. तसंच एनपीसीआयनं सी-एज टेक्नॉलॉजीजला एनपीसीआयद्वारे चालवल्या जाणाऱ्या किरकोळ देयक प्रणालीपर्यंत पोहोचण्यापासून थांबवलं असल्याचं यात नमूद करण्यात आलंय. सीएज द्वारे सेवा घेणाऱ्या बँकांच्या ग्राहकांना या कालावधीदरम्यान या सेवांचा वापर करता येणार नाही.
एका नियामक प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनं दिलेल्या माहितीनुसार सुमारे ३०० लहान बँका देशाच्या व्यापक पेमेंट नेटवर्कपासून अलिप्त झाल्या आहेत. सायबर हल्ल्याचा प्रभाव आणखी पसरू नये म्हणून हे पाऊल उचलण्यात आलंय. यातील बहुतांश छोट्या बँका असून त्याचा परिणाम देशाच्या पेमेंट सिस्टीमच्या केवळ ०.५ टक्के असेल.
भारतात सुमारे १,५०० सहकारी आणि प्रादेशिक बँका आहेत, ज्या बहुतेक मोठ्या शहरांबाहेर कार्यरत आहेत. यातील काही बँकांना याचा फटका बसला आहे,’ अशी माहिती सूत्रांनी रॉयटर्सला दिली. दुसऱ्या सूत्रानं दिलेल्या माहितीनुसार हा हल्ला आणखी पसरू नये यासाठी एनपीसीआय ऑडिट करत आहे. आरबीआय आणि भारतीय सायबर अधिकाऱ्यांनी गेल्या काही आठवड्यात संभाव्य सायबर हल्ल्यांबद्दल भारतीय बँकांना इशारा दिला होता, अशी माहिती बँकिंग उद्योगातील सूत्रांनी दिली
