सातारा रत्नागिरी बससेवेला प्रशासनाचा अडथळा
एसटी सेवा सुरू करा अन्यथा याद राखा :सुहास राजेशिर्के
सातारा
कोकणातून साताऱ्यात स्थायिक झालेल्या बांधवांसाठी माजी उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के यांच्या प्रयत्नाने सातारा रत्नागिरी एसटी बस सेवा सुरू करण्यात आली होती .मात्र सातारा मध्यवर्ती आगार प्रशासनाच्या उदासीनतेमुळे या बससेवेला फटका बसत आहे . साताऱ्यातून रत्नागिरी गाडीचे रिझर्वेशन केले असता प्रवाशांना उंब्रज अथवा कराड पर्यंत जाण्याचा मनस्ताप सोसावा लागत आहे सातारा रत्नागिरी बस सेवा सुरळीत करा त्या मार्गासाठी नवीन गाडी द्या अन्यथा याद राखा गाठ माझ्याशी आहे असा इशारा माजी उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के यांनी दिला आहे

रत्नागिरी आणि सातारा या दोन जिल्ह्यांचे अंतर सुमारे 120 किलोमीटर आहे .सातारा आगाराकडून करोनापूर्वीच्या काळामध्ये तब्बल 30 वर्षे सातारा रत्नागिरी बस सेवा सुरू होती .या सेवेचे सातारा आगाराला मिळणारे उत्पन्न दिवसाला 23 ते 25 हजार रुपये इतके होते .मात्र गेल्या साडेतीन ते चार वर्षापासून ही बस सेवा सातत्याने तांत्रिक कारण देऊन खंडित केली जात आहे .गेल्या वर्षभरापासून माजी उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के यांनी सातारा मध्यवर्ती आगाराचे विभाग नियंत्रण रोहन पलंगे यांच्याकडे पाठपुरावा करून ही बस सेवा पुन्हा एकदा नव्याने सुरू केली .साताऱ्याच स्थायिक झालेल्या कोकणस्थ बांधवांना रत्नागिरीला जाण्यासाठी मोठी सोय उपलब्ध झाली होती
सध्या आगामी श्रावण महिना गौरी गणपती हा कोकणस्थ बांधवांचा गडबडीचा हंगाम लक्षात घेता सातारा रत्नागिरी बस सेवा तातडीने सुरू होणे गरजेचे आहे .सातारा आगाराकडून रत्नागिरी गाडीचे रिझर्वेशन घेतले जाते मात्र त्यांना पंढरपूर गाडीत बसून देतो किंवा उंब्रज अथवा कराडला जाऊन तिथून बदली गाडी घ्यावी अशा सूचना दिल्या जातात .त्यामुळे एकाच तिकिटाच्या पैशांमध्ये प्रवाशांना बदली बस करून जावे लागते आणि आर्थिक भुर्दंड पडतो तो वेगळाच .पंढरपूर यात्रेसाठी जादा बसेस सातारा कडून सोडण्यात आल्या होत्या मात्र यात्रा संपूनही आता सहा दिवस उरले अद्याप सातारा रत्नागिरी बस उपलब्ध होत नाही मग बस उपलब्ध नसताना सातारा रत्नागिरी बसचे रिझर्वेशन कसे घेतले जाते ? असा संतप्त सवाल येथील प्रवाशांनी विचारला आहे या संदर्भात माजी उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के यांनी सातारा रत्नागिरी बस सेवा नवीन गाडीसह सुरळीत करा असा इशारा दिला आहे बस सुरळीत न झाल्यास गाठ माझ्याशी आहे असा इशारा त्यांनी आगार प्रमुखांना दिला आहे याबाबत त्यांनी दिलेल्या इशारा पत्रात नमूद आहे की मी मूळचा कोकणातील असून जन्मभूमी रत्नागिरी आणि कर्मभूमी सातारा आहे येथील कोकणस्थ बांधवांना कोणी वाली नाही असे समजू नका सातारा रत्नागिरी बस तातडीने सुरू करा अन्यथा आम्हाला आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल असे त्यांनी पत्रकात नमूद केले आहे
