महागाई भत्त्यात 4 टक्के वाढ
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी
मुंबई
राज्य सरकारकडून कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ४ टक्के वाढ करण्यात आली आहे. परिणामी, आता ७ व्या वेतन आयोगानुसार, सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ४६ टक्क्यांवरून ५० टक्क्यांपर्यंत वाढ होणार आहे. विशेष म्हणजे १ जानेवारी २०२४ ते ३० जून २०२४ या कालावधीतील थकबाकीसह जुलै २०२४ या महिन्याच्या वेतनासोबत वाढीव महागाई भत्ता सरकारी कर्मचाऱ्यांना देण्याबाबत राज्य सरकारकडून घोषणा करण्यात आली आहे.
कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय केंद्र सरकारकडून आपल्या कर्मचाऱ्यांसाठी घेतला जातो. त्यानंतर राज्य सरकारकडून राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी वाढीव भत्ता देण्याचा निर्णय घेतला जातो. प्रामुख्याने वर्षातून दोन वेळा महागाई भत्त्यात वाढ केली जाते. राज्य सरकारकडून काढण्यात आलेल्या म्हटल्याप्रमाणे कर्मचाऱ्यांना वाढीव भत्ता हा १ जुलैपासून लागू होणार आहे. सरकारी निम-सरकारी जिल्हा परिषद कर्मचारी अशा सर्व कर्मचाऱ्यांना हा वाढीव महागाई भत्ता मिळणार आहे. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे आणि जून अशा सहा महिन्यांच्या थकबाकीसह हा भत्ता मिळणार आहे.
राज्य सरकारकडून १ जानेवारी २०२४ रोजी सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्यात आलेली नव्हती. याआधी राज्य सरकारकडून सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात २३ नोव्हेंबर २०२३ रोजी अखेरची वाढ करण्यात आली होती. त्यावेळी देखील राज्य सरकारने महागाई भत्त्यात ४२ टक्क्यांवरून वरून ४६ टक्के अर्थात ४ टक्के वाद केली होती. दरम्यान, त्यावेळी देखील आधीच्या जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर या महिन्याचा वाढीव महागाई भत्ता नोव्हेंबरच्या वेतनात देण्यात आला होता. अशातच आता जानेवारीपासूनचा महागाई भत्ता जुलैच्या वेतनात राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार आहे.
