अभ्यासक्रमात मनुस्मृतीचा श्लोक नाही
देवेंद्र फडणवीस यांचा स्पष्ट खुलासा
वाराणसी
शालेय अभ्यासक्रमात कुठेही मनुस्मृतीचा श्लोक आणला जाणार नसल्याचे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.
देवेंद्र फडणवीस वाराणसी दौऱ्यावर असून उत्तर प्रदेशात 7 व्या आणि अंतिम टप्प्यातील प्रचारासाठी ते पोहोचले आहेत. काशी येथे काशी-महाराष्ट्र समागम कार्यक्रमानंतर त्यांनी पत्रकारांशी बोलताना राज्यातील पुणे अपघात आणि मनुस्मृती व जितेंद्र आव्हाड यांच्या आंदोलनावरही भाष्य केले.
कुठल्याही अभ्यासक्रमात कुठेही मनुस्मृतीचा श्लोक घेण्याचा विचारदेखील महाराष्ट्र सरकारमध्ये कोणी केलेला नाही, कधीही आलेला नाही, त्यासंदर्भात कुठलीही चर्चा नाही, असे म्हणत फडणवीसांनी भूमिका स्पष्ट केली. तसेच, त्यांनीच ही चर्चा आणली, त्यांनीच आंदोलन केले आणि जेव्हा खोटं आंदोलन करताना माणूस कसं काम करतो, हे आंदोलन करताना डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो त्यांनी फाडला. पण, महाराष्ट्र हे कदापि सहन करणार नाही, असेही फडणवीस यांनी म्हटले.
दरम्यान, मी काशीत प्रचाराला नाही तर लोकांचा उत्साह पाहायला आलो आहे. काशी येथे आपण प्रचाराला आलेलो नाही, त्याची गरज सुद्धा नाही. पण, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दिग्विजयात मराठी माणसाचा इतका मोठा सहभाग आहे, याचा मला आनंद आहे, असेही फडणवीसांनी काशीतून बोलताना म्हटले.
