मला नाईलाजाने यांच्यासोबत राहावं लागतंय
संजय राऊतांनी फोन केल्याचा नरेश म्हस्केंचा दावा
मुंबई
मला नाईलाजाने उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहावं लागतंय,एकनाथला सांग,माझ्याबद्दल मनात काही काळं ठेवू नको,असा फोन संजय राऊतांनी केल्याचा दावा ठाणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार नरेश म्हस्के यांनी केला आहे
एकनाथ शिंदे यांना सर्वात जास्त ऊर्जा उद्धव ठाकरे यांनीच दिली आहे, अशी ऊर्जा त्यांना देऊ नका हा माणूस घात करेल असे सांगणारी लोकं आज त्यांच्याच वतीभोवती ठाण्यात आहेत. आताचे ठाण्यातील खासदार-आमदार आहेत, त्यांनीच उद्धव ठाकरेंना म्हटले होते की, साहेब हा माणूस तुम्हाला धोका देईल, यांची नियत चांगली नाही, असे वक्तव्य शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केले आहे. आता ठाणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार नरेश म्हस्के यांनी संजय राऊत यांनीच आपल्याला फोन केल्याचा दावा केला
नरेश म्हस्के म्हणाले की, एकनाथ शिंदे यांनी भूमिका घेतल्यानंतर तुम्ही रोज मला फोन करत होतात. एकनाथला सांग, मला नाईलाजाने यांच्यासोबत राहावे लागत आहे. पण, माझ्याबद्दल मनात काही काळं ठेवू नको, हे तुम्ही मला स्वत: फोन करुन सांगत होतात. विसरलात का? असा पलटवार त्यांनी संजय राऊत यांच्यावर केलाय. तर ही बंद मूठ उघडली तर तुम्हालाच भारी पडेल, असा इशारा देखील त्यांनी संजय राऊतांना दिला आहे.
नरेश म्हस्के पुढे म्हणाले की, एकनाथ शिंदे यांनी भूमिका घेतली, त्याच दिवशी उद्धव ठाकरेंनी मला फोन केला होता. मला भेटायला ये असे सांगितले होते. त्या दिवशीही आम्ही एकनाथ शिंदेंसोबत आहोत, भेटायला येणार नाही, असे आम्ही सांगितले होते. शिंदे साहेबांनी जी भूमिका घेतली, आम्ही त्यांच्या सोबतच आहोत, असेही त्यांनी म्हटले. ते पुढे म्हणाले की, बाळासाहेबांना शेवटच्या दिवसांत त्यांनी किती त्रास दिला, हे सगळ्यांना माहित आहे. राज ठाकरे त्याबाबत अनेकदा बोलले आहेत. बाळासाहेबांना अखेरच्या दिवसांत त्यांनी त्रास दिलाच पण त्यांच्या निधनानंतर शिवसेनेच्या दुष्मनांशी हातमिळवणी करून आताही यातना देत आहेत

