पॅडी नाही,डॅडी शिवलकर


क्रिकेटमधील देवमाणूस पद्माकर शिवलकर
विशेष लेख/शरद महाजनी

सचिन तेंडुलकर याला क्रिकेटचा देव म्हणून ओळखता ना…मग पद्माकर शिवलकर यांना देवमाणूस म्हणून ओळखले पाहिजे . क्रिकेट हा सभ्य माणसांचा खेळ अशी जेव्हा ओळख करून दिली जात होती,ती त्या वेळी शिवलकरसारखे खेळाडू खेळत होते म्हणून असेल कदाचित. कारण त्यांच्यातका जंटलमन क्रिकेटर मी तरी पाहिला नाही. क्रिकेटच्या मैदानावर अधिराज्य गाजवणारा तो महान फिरकी गोलंदाज होता,म्हणून त्यांची ओळख डॅडी शिवलकर अशीच करून द्यायला हवी.नशिबाची साथ नसल्याने ते भारताकडून खेळले नाहीत,हे केवळ त्यांचेच दुर्दैव नाही तरआपलेही. नाही तर आणखी एक मॅचविनर गोलंदाज भारताला मिळाला असता!
रणजी,इराणी कप क्रिकेट स्पर्धेत मुंबईने जी दादागिरी केली ती शिवलकरसारखा हुकमी एक्का त्यांच्याकडे होता म्हणून. प्रतिस्पर्धी संघातील दादा फलंदाजसुध्दा त्याच्या समोर खेळताना मामुली वाटावेत असा त्यांचा दबदबा होता. मला आठवते 1969 मध्ये मुंबईच्या ब्रेबर्न स्टेडियमवर मी त्यांना पाहिले होते ते राजस्थान बरोबरच्या रणजी ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात.त्याच सामन्यात सुनील गावसकर यांनी पहिले रणजी शतक झळकावले होते. त्यानंतर पुण्याच्या नेहरू स्टेडियमवर दुलीप ट्रॉफी अंतिम सामन्यात त्यांना मी पश्चिम विभाग संघातून खेळताना पाहिले होते.टिच्चून गोलंदाजी म्हणजे काय हे त्यांना पाहिले की समजत असे.पाच सहा पावलांचा सरळ स्टार्ट,ती सहज सुंदर स्टाईल,अचूकदिशा,
फलंदाजांची सत्वपरीक्षा घेणारी ती गोलंदाजी मी कधी विसरू शकत नाही.अजित वाडेकर, सुनील गावसकर,सुधीर नाईक हे जेव्हा मुंबईचे कर्णधार होते,तेव्हा शिवलकरसारखा हुकमी एक्का असल्याने त्यांनी अशक्यप्राय विजय मिळवले होते.

Advertisement

काही वर्षांपूर्वी जेव्हा वन डे, टी 20 सारखा झटपट क्रिकेटचा जमाना सुरू झाला तेव्हा एकाने शिवलकर यांना प्रश्न केला होता, तुमच्या काळात असे क्रिकेट असते तर तुम्ही त्यात खेळला असता का?नक्कीच,असे उत्तर देत शिवलकर यांनी आपली भूमिका स्पष्ट मांडली.मला पण खात्री आहे की क्रिकेटच्या या प्रकारातही शिवलकर यांनी दादागिरी केली असती.आज भारतीय संघात रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, अक्षर पटेल असे तीन तीन डावखुरे फिरकी गोलंदाज खेळतात. अशीच संधी बिशनसिंग बेदी संघात असताना जर शिवलकर यांनाही मिळाली असती तर काय धमाल आली असती….त्या काळात प्रसन्न,वेंकट राघवन असे दोन ऑफ ब्रेक गोलंदाज एकाच वेळी भारतीय संघात होते.मग तोच निकष बेदी,शिवलकर यांच्या बाबतीत का लावला गेला नाही..अर्थात एखादा खेळाडू कमनशिबी ठरतो त्याला देव, दैव् तरी काय करणार…?
शिवलकर असे कमनशिबी ठरले याचे दुःख अनेक दिग्गज आणि लाखो क्रिकेट प्रेमींना आहे,पण तरीही त्यांची महानता किंचित कमी होत नाही,उलट ती प्रकर्षाने जाणवते. शापित गंधर्व हा शिक्का त्यांच्या भाळी नियतीनं लिहिला होता याचे दुःख तिलाही झाले असेल.पण..शिवलकर यांनी मात्र ते दुःख उराशी न बाळगता वयाच्या पन्नाशीपर्यंत मैदानात त्याच निष्ठेने खेळणे पसंत केले. कोणतेही ग्लॅमर नसलेला हा महान फिरकी गोलंदाज महान म्हणूनच ओळखला गेला,राहील.शिस्तप्रिय आयुष्य जगणारा हा महान क्रिकेटर माणूस म्हणूनही तेवढाच मोठा होता.त्यांच्यातील सहृदयी माणूस मी पाहिला, तसा सुरेल आवाजाचा गायक म्हणूनही अनुभवला. त्या काळात ऑर्केस्ट्रातही ते गात असत.त्यांनी गायलेली काही गाणी आजही ओठावर,मनात कायम स्वरुपी घर करून राहिली आहेत.
अशा या महान क्रिकेटरला अगदी जवळून पाहण्याची संधी मला मिळाली.गोष्ट जुनी आहे.1980 मध्ये सातारच्या शाहू स्टेडियमवर टाटा आणि निरलाॅन संघात सामना झाला होता.एम.सी.ए. चे तत्कालीन सचिव बापूसाहेब जोशी यांच्या सन्मानार्थ हा सामना झाला.सुनील गावसकर, संदीप पाटील,दिलीप वेंगसरकर,चेतन चौहान आणि अनेक कसोटीपटू त्या सामन्यात खेळले. पद्माकर शिवलकर टाटा संघात होते. त्यावेळी खेळाडू कक्षात मी स्वयंसेवक म्हणून काम पाहात होतो.दोन्ही संघातील खेळाडूंसाठी पार्टीशन असलेले छोटे हॉल ड्रेसिंग रूम म्हणून दिले होते.कसोटीपटू खेळत असल्याने प्रेक्षकांची तुफान गर्दी होती. तरुण,तरुणी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. खेळाडूंना जवळून पाहात त्यांची स्वाक्षरी घेण्याचा फंडा होता.तिथे मी आणि शिवलकर बोलत उभे होतो.एवढ्यात तरुण मुलींचा घोळका तिथे कसा कोण जाणे आला आणि ड्रेसिंग रूममध्ये जाऊ लागला. ते पाहून शिवलकर यांनी त्यांना रोखले आणि विचारले, काय पाहिजे?..त्यावर त्या म्हणाल्या,आम्हाला खेळाडूंना जवळून पाहायचे आहे आणि त्यांची सही घ्यायची आहे.त्यावर शिवलकर त्यांना म्हणाले,तुम्हाला असे आत जाता येणार नाही.खेळाडू खेळून आलेले असतात. दमलेले असतात.कोणी कीट,कपडे घालत असते..तुम्ही नंतर या..त्यांचे ते उत्तर ऐकून त्या तरुणी नाराज होऊन परत गेल्या.पण मला मनापासून भावला तो शिवलकर यांच्यातला शिस्तप्रिय माणूस आणि क्रिकेटर.प्रसंग छोटा होता,पण तो योग्य रीतीने निभावून नेण्याची त्यांची हातोटी मला भावली.
आज क्रिकेटची दुनिया बदलली आहे,ग्लॅमर,प्रचंड पैसा,दिखाऊपणा सारे काही आले आहे. सारा मामला उघडपणे दाखवणारे कॅमेरे सतत टपून बसलेले आहेत. त्यावर कॉमेंट करणारी माध्यमे सहज उपलब्ध आहेत,त्याच त्या चर्चा, गॉसिप यांना ऊत आला आहे.अशा पार्श्वभूमीवर पद्माकर शिवलकर यांच्या सारखा क्रिकेटर पुन्हा पुन्हा आठवत
राहावा आणि क्रिकेट हा जंटलमन्स गेम म्हणून पुन्हा एकदा ओळखला जावा असे मनोमन वाटते.
क्रिकेटच्या दुनियेतील तो खराखुरा जंटलमन, त्या दुनियेचा एक अनभिषिक्त सम्राट आज आपण कायमचा गमावला आहे.पण त्याच्या आठवणी मात्र सतत सोबत असतील यात शंका नाही.
गुड बाय पॅडी.. नाही,डॅडी…
-शरद महाजनी


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!