देवेंद्र फडणवीस उद्धव ठाकरे भेट
नागपूरमधील भेटीने राजकीय चर्चा सुरु
नागपूर
गेल्या अडीत वर्षांपासून ज्यांनी एकमेकांकडे सरळ तोंडाने बघितलं नाही, ज्यांच्यावर अगदी टोकाची भूमिका घेत टीका केली ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना उबाठा पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची आज नागपुरात भेट झाली. उद्धव ठाकरे हे आज फडणवीसांच्या कार्यालयात त्यांची भेट घेण्यासाठी पोहोचले
उद्धव ठाकरे आमदार आदित्य ठाकरे, अनिल परब यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या दालनात पोहोचले. आपल्या हातातील बुके देऊन फडणवीसांचे अभिनंदनही केले. त्यानंतर, हात जोडून ते निघाले असता देवेंद्र फडणवीसांनी या बसा.. असे म्हणत बसण्याचा आग्रह केला. त्यानंतर, उद्धव ठाकरेंनी देखील खाली बसून त्यांच्यासोबत 6 ते 7 मिनिटे चर्चा केली. या दोघांच्या भेटीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यामध्ये, सोफ्यावर बसून दोन्ही नेते चर्चा करताना दिसत आहेत. या भेटीने राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
दरम्यान, ही सदिच्छा भेट होती, दोन्ही नेत्यांचे अभिनंदन करण्यासाठीची ही भेट होती, असे सांगण्यात आले. ही केवळ सदिच्छा भेट होती, आम्ही निवडणूक जिंकू शकलो नाही, महायुती निवडणूक जिंकलीय. त्यामुळे आता महाराष्ट्राच्या हिताची काम होतील अशी अपेक्षा आहे. हे सरकार कसं आल ते आम्ही जनतेच्या माध्यमातून आवाज उठवणार आहोत, असे उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांच्या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना म्हटले.
ज्यांनी नेहमीच फडणवीस हे शिवसेना पक्ष फुटीतले व्हिलेन असल्याचा आरोप केला त्या उबाठा नेत्या सुषमा अंधारे यांनी या भेटीवर प्रतिक्रिया देताना यात भुवया उंचावण्याचं काहीही कारण नसल्याचं सांगितलं.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीबाबत बोलताना सुषमा अंधारे म्हणाल्या की, याबाबत भुवया उंचावण्याचं काही कारण नाही. देवेंद्र फडणवीस हे फक्त एक व्यक्त नाही तर एका राज्य संस्थेचे प्रमुख म्हणून त्यांना भेटायला उद्धव ठाकरे गेले आहेत. सध्या महाराष्ट्रातील जे अनेक प्रश्न आहेत, मराठवाडा अशांत आहे, बीड प्रकरण, परभणी जाळपोळ हिंसाचार असेल, त्यातील जबाबदार पोलिसांच्या बडतर्फीची मागणी असेल, दोन मृत्यू झाले त्याची चौकशी करायची आहे, अशा अनेक मुद्द्यांवर राज्यसंस्थेच्या प्रमुखांशी बोलणं गरजेचं आहे, जर पक्षप्रमुख ती मांडणी करत असतील तर त्यात काही हरकत नाही.

