थंडी गायब; हिवाळ्यात निघतोय घाम
वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा इशारा कायम
मुंबई
राज्यभरात थंडी गायब झाली असून राज्यात सध्या भर हिवाळ्यात उन्हाळ्याचा अनुभव मिळत आहे. परिणामी ढगाळ हवामानामुळे चांगलाच घाम निघत आहे. दक्षिण मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा इशारा कायम असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.
देशाच्या उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडीचा कडाका कायम असल्याने काल पंजाबच्या ‘अदमपूर’ येथे देशाच्या सपाट भूभागावरील यंदाच्या हंगामातील नीचांकी ३.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. महाराष्ट्रात मात्र पावसाला पोषक हवामान झाल्याने उत्तरेकडील थंड वाऱ्यांना अडथळा झाला आहे. यातच उन्हाचा चटका वाढल्याने बहुतांश ठिकाणी तापमान ३२ अंशांच्या पार गेले आहे. थंडीची चाहूल लागल्यानंतर अचानक पावसाळी हवामान होत वाढलेला चटका अधिक तापदायक वाटत आहे.
राज्याच्या अनेक भागात अंशतः ढगाळ आकाश झाले असून, बऱ्याच ठिकाणी किमान तापमान १७.२ अंशांच्या पुढे गेल्याने थंडी नाहीशी झाली आहे. दिवसभर असलेल्या ढगाळ हवामानासह कमाल तापमानात वाढ झाली आहे. ब्रह्मपुरी येथे तापमान ३३ अंशांपार गेले आहे. चंद्रपूर येथे ३१.२ तर नागपूर येथे ३१.६ तर भंडारा येथे विदर्भात सर्वाधिक ३४.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली

