काँग्रेस भवनात शंकरराव जगताप यांना श्रद्धांजली
सातारा
सर्व समाज घटकांना सामाजिक न्याय देत उदात्त भूमिका घेत व्यापक विचारांची पाठराखण करणे, हीच शंकरराव जगताप यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे प्रतिपादन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रणजीत से देशमुख यांनी केले
येथील काँग्रेस भवनातील महात्मा गांधी सभागृहात विधानसभेचे माजी सभापती ज्येष्ठ नेते शंकरराव जगताप यांना तेराव्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते.
दिवंगत जगताप यांनी आयुष्यभर काँग्रेस विचारांची पाठराखण करीत विकासाचे राजकारण केले. सत्तास्थानी सामान्य माणसाच्या हिताचे निर्णय व्हावेत, ही त्यांची अपेक्षा होती, त्यानुसारच त्यांनी आयुष्यभर राजकीय वाटचाल केली, असे स्पष्ट करून अध्यक्ष देशमुख यांनी सांगितले ,की आता जातीपातीच्या राजकारणाने वेग घेतला आहे. सर्व समाज घटकांना न्याय देताना काँग्रेसने ओबीसी समाजालाही वेळोवेळी राजकीय नेतृत्व देताना आपली व्यापक भूमिका जोपासली. सद्यस्थितीत आरक्षणाच्या प्रश्नावरही काँग्रेस मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी आग्रही राहत असताना ओबीसी समाजाचे हित पाहत आहे. परंतु भाजपसारखे पक्ष राजकीय हेतू मनात ठेवून समाज मन कलुषित करत आहे. शंकराव जगताप यांच्यासारख्या नेत्यांना हे निश्चितच क्लेश देणारे ठरले असते.
प्रदेश सरचिटणीस राजेंद्र शेलार, भानुदास माळी , नाजीम इनामदार, रजनी पवार, प्रकाश फरांदे यांची यावेळी भाषणे झाली.
ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष जगन्नाथ कुंभार यांनी प्रास्ताविक केले. कोरेगाव तालुका काँग्रेसचे अध्यक्ष अँड श्रीकांत चव्हाण यांनी स्वागत केले.
सुरुवातीला सर्व उपस्थितांनी शंकरराव जगताप यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण केली .
दिवंगत कार्यकर्ते प्रल्हादराव शिंदे यांनाही यावेळी श्रद्धांजली वाहण्यात आली. अमर करंजी यांनी आभार मानले.
या प्रसंगी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमरजीत कांबळे, खजिनदार बाबासाहेब कदम, नंदा भाऊ जाधव , ॲड .दत्तात्रय धनावडे, रजिया शेख, मनोज कुमार तपासे, आनंदराव जाधव, अन्वर पाशा खान, मालन परळकर आदी उपस्थित होते.
छायाचित्र ओळी:
काँग्रेस भवनात सोमवारी विधानसभेचे माजी सभापती शंकरराव जगताप यांच्या प्रतिमेला स्मृतिदिनानिमित्त पुष्पांजली अर्पण करताना जिल्हाध्यक्ष रणजीत देशमुख, प्रदेश सरचिटणीस भानुदास माळी, राजेंद्र शेलार आदि…

