मीच मुख्यमंत्री होणार
नाना पटोलेंच्या वक्तव्याने उद्धवसेनेमध्ये खळबळ
मुंबई
राज्यात कोणत्याही क्षणी निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. यामुळे महायुतीसह महाविकास आघाडी जोरदार तयारीला लागले आहे. महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्रिपदावरुन रान पेटले आहे. आता कॉग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्रिपदाबाबत सूचक वक्तव्य केले आहे. त्यांच्या वक्तव्यामुळे महाविकास आघाडीमधील दुसरे घटक पक्ष असलेल्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची झोप उडाली आहे.
तर दुसऱ्या बाजूला लोकसभा निवडणूकीमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावलेल्या आणि निवडणुकीच्या निकालामध्ये बाजी मारलेला कॉंग्रेस पक्षाच्या देखील महत्त्वकांशा वाढल्या आहेत. कॉंग्रेस हाच मोठा भाऊ आहे, त्यामुळे कॉंग्रेसकडून सुद्धा मुख्यमंत्रिपदावर दावा केला जात आहे. कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले मीच मुख्यमंत्री होणार असे म्हणाले आहेत. त्यांच्या या विधानामुळे उद्धव ठाकरे यांची चिंता वाढवली आहे.
यामुळे महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्रिपदावर रस्सीखेच सुरु असल्याचे स्पष्ट आहे. शरद पवार यांनी निवडणूकीनंतर मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर केला जाईल, अशी भूमिका घेतली आहे. तर निवडणूकीच्या आधीच मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करावा अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली आहे. त्यामुळे आता निवडणुकीनंतर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले तर मुख्यमंत्री नाना पटोले होणार की उद्धव ठाकरे यांची चर्चा रंगली आहे

