रंगोली ग्रुपच्या सुरेल गाण्यांना रसिकांचा प्रतिसाद
वसंतशेठ जोशी यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न
सातारा
दीपलक्ष्मी सहकारी नागरी पतसंस्था आणि रंगोली ग्रुपच्या संयुक्त विद्यमाने साताऱ्यात दीपलक्ष्मी हॉलमध्ये हिंदी आणि मराठी सुरेल गाण्यांचा कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाचा शुभारंभ साताऱ्याचे हॉटेल व्यवसायातील उद्योजक आणि सामाजिक क्षेत्रातील प्रमुख नेतृत्व वसंतशेठ जोशी यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमात सुरेश, हेमंत, चेतन, दुर्गा, शुभांगी, साक्षी यांनी सुरेल गाणी सादर केली. ध्वनी व्यवस्था प्रमोद लोंढे यांनी सांभाळली.
सर्वच गायकांची गाणी श्रोत्यांवर भुरळ पाडणारी होती. चेतन भडकमकर यांनी गायनाबरोबर परफॉर्मन्सनं सुद्धा श्रोत्यांचे मन मोहवून टाकले. श्रोत्यांनी या कार्यक्रमाचा मनापासून आस्वाद घेतला.
शिरीष चिटणीस हे स्वतः एक हरहुन्नरी व्यक्तिमत्व असून कलाकारांना वाव मिळावा म्हणून सतत प्रयत्नशील असतात.साताऱ्यातल्या कलाकारांना पुढे नेण्यासाठी ते सतत प्रयत्न करत असतात.असे गौरोद्गार वसंत जोशी यांनी काढले.हा कार्यक्रम म्हणजे संगीत प्रेमींसाठी एक मेजवानीच आहे असेही ते म्हणाले.
यावेळी शिरीष चिटणीस म्हणाले, हा हॉल चित्रप्रदर्शन, पुस्तक प्रकाशन, पुस्तकांवर चर्चा, संगीत मैफिली आणि इतर वाचन संस्कृती विकसित होण्यासाठी च्या कार्यक्रमासाठी मोफत दिला जातो. विजय साबळे यांचा नुकताच शंकर-जयकिशन यांच्या शब्दबद्ध केलेल्या संगीतमय गाण्यांचा कराओके पुण्यामध्ये झालेला कार्यक्रम सर्वांना खूप आवडला. लगेच त्यांनी ऑगस्टमध्ये आता मुकेश यांच्या गाण्यांचा कार्यक्रम तेथे घेतलेला आहे. सातारची मंडळी पुण्यापर्यंत जावी व पुण्याची मंडळी इथे यावीत आणि कॉमन व्यासपीठ निर्माण व्हावे असा आमचा प्रयत्न आहे. तीन तारखेपासून दहा तारखेपर्यंत जगातले काही महत्त्वाचे चित्रपट या ठिकाणी दाखवले जाणार आहेत.चित्रपट हे माध्यम आपणाला असे काही देऊन जाते की ते आपल्याला पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवता येते. कलेला वाव देण्यासाठी दीपलक्ष्मी पतसंस्थेचा हॉल उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही नेहमीच प्रयत्न करत असतो.
यावेळी काका पाटील म्हणाले, भीमसेन जोशी यांचे नातू विराज जोशी यांचा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या हॉलमध्ये जो गाण्यांचा कार्यक्रम झाला तो कार्यक्रम आम्ही संपूर्णपणे ऐकला. पंडित भीमसेन जोशी भारतरत्न होते. विराज जोशी बीए करत शास्त्रीय संगीताकडे वळला. तो ज्या उच्च पटीमध्ये गायन करतोय त्यामध्ये खूप मोठी साधना आहे. संगीत हे असे क्षेत्र आहे की त्यामध्ये जेवढे तुम्ही खोलवर जाल त्यामध्ये आणखी सापडत जाते. चंद्र विलास हॉटेलचे वसंत जोशी सर्वांनाच खूप मोठ्या प्रकारे मदत करत असतात. दीपलक्ष्मी पतसंस्था सामाजिक बांधिलकी जोपासत असते. शिरीष चिटणीस हे ग्रंथमहोत्सवापासून पूर्वी झालेल्या साहित्य संमेलनाला त्यांनी भरीव योगदान दिलेले आहे. त्यांनी साताऱ्यातच नाही तर पुण्यात सुद्धा आपल्या कामाचा ठसा उमटवलेला आहे. त्यांनी पुण्यात सुद्धा कराओके चा ग्रुप निर्माण केलेला आहे. ते पुण्यामध्ये स्वतः गेले नाहीत तर इथली लोकं सुद्धा पुण्यामध्ये नेलेली आहेत. ही फार आपल्याला अभिमानाची बाब आहे. या रंगोली ग्रुपला मी कार्यक्रमासाठी शुभेच्छा देतो. डॉ सारिका देशपांडे,डॉ कामिनी पाटील या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या

