अशोक चव्हाण-मनोज जरांगे भेट
दोन तासांच्या बैठकीत काय घडलं याबाबत उत्सुकता
जालना
भाजप खासदार अशोक चव्हाण आणि खासदार संदिपान भुमरे यांनी शुक्रवारी रात्री जालन्यातील अंतरवली सराटी मध्ये मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. सरपंचाच्या घरी झालेली ही भेट तब्बल दोन तास चालली.यावेळी अशोक चव्हाण , संदिपान भुमरे आणि मनोज जरांगे यांच्यादरम्यान अनेक मुद्यांवर सविस्तर चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. या भेटीत नेमकी काय चर्चा झाली. मनोज जरांगे यांनी सरकारला दिलेल्या मुदतीबाबात काय बोलणं झालं, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.
मराठा आरक्षण, सगे सोयरे कायद्यांची अंमलबजावणी करणे, हैद्राबादसह विविध संस्थाचे गॅजेट स्विकारणे, जात प्रमाणपत्र वाटप चालू करणे,गुन्हे वापस घेणे, मुलींना मोफत शिक्षण लागु करणे,मुलींची फी माफ करणे इत्यादी मुद्यासंदर्भात मनोज जरांगे आजपासून हिंगोलीपासून मराठा आरक्षण शांतता जनजागृती रॅलीला सुरूवात करत आहेत. त्यापूर्वी अशोक चव्हाण आणि संदिपान भुमरे यांच्याशी महत्वाच्या मुद्यावर चर्चा झाली.
या बैठकीमध्ये काय चर्चा झाली, काय बोलणं झालं याबाबत माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे राज्यसभा खासदार अशोक चव्हाण यांनी स्पष्ट सांगितलं. एक वैयक्तिक पातळीवर चर्चा झाली. हा विषय लवकर मार्गी लागला पाहिजे. मनोज जरांगे यांच्याशी दोन ते तीन विषयांवर आम्ही विस्तृत चर्चा केली असून ती सकारात्मक झाली आहे. जरांगे पाटील यांच्या भेट घेण्यासाठी मला कुणीही पाठवलेले नाही. मराठा समाजाचा एक कार्यकर्ता म्हणून मी त्यांच्या भेटीसाठी आलो आहे. शासन स्तरावर आम्ही मागण्याचा पाठपुरावा करतोय. आम्हीही दोघही खासदार आहोत. सर्व मागण्याचा शासन स्थरावर पाठपुरावा करण्यासाठी चर्चा झाली. समन्वयाची भूमिका असणं महत्वाचं आहे, असे चव्हाण यांनी नमूद केलं. हा विषय जेवढ्या लवकर संपवता येईल तेवढा संपलेला बरा, आमचा सर्वांची इच्छा आहे, असेही ते म्हणाले.
दरम्यान चव्हाणांच्या भेटीनंतर मनोज जरांगे यांनीही माध्यमांशी संवाद साधला. अशोक चव्हाण हे सरकार ,समाज किंवा माध्यम म्हणून आलेत का? हा विषय महत्त्वाचा नसून त्यांच्या माध्यमातून चर्चा सुरूच राहील. बाकी आमच्या मागण्याबाबत पाठपुरावा सुरूच राहणार असून, हैदराबाद गॅजेट आणि सरसकट गुन्हे मागे घेण्याबाबत चर्चा झाल्याचं मनोज जरांगे यांनी नमूद केलं.
