नक्षल्यांच्या गडात वाजणार शाळेची घंटा
तब्बल २० वर्षांनंतर गावात शाळा होणार सुरु
नागपूर
गेल्या काही महिन्यांपासून लगतच्या छत्तीसगडमध्ये पोलीस आणि नक्षल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात चकमक सुरू आहे अशातच येथील आदिवासींना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शिक्षणाशिवाय पर्याय नाही म्हणून गेल्या काही वर्षांपूर्वी बंद पडलेल्या आणि नवीन काही शाळा सुरू करण्याचे काम शासनाने हाती घेतला आहे. त्याअनुषंगाने बीजापूर जिल्ह्यातील अतिसंवेदनशील, आदिवासीबहुल आणि नक्षलग्रस्त कावडगांव येथे जिल्हाधिकारी अनुराग पांडेय यांच्याहस्ते २० वर्षांपूर्वी बंद पडलेली शाळा सुरू करण्यात आली आहे. विशेष म्हणजे नक्षल्यांच्या गडात त्यांच्याच स्मारकांसमोर शाळा उघडण्यात आली आहे. २००५ मध्ये नक्षलवाद्यांच्या अत्याचारा विरोधात छत्तीसगड राज्यातील आदिवासींनी सलवा जुडुम (शांती मोहीम) द्वारे लढा उभारला होता.आदिवासींनी पुकारलेला या लढ्यात त्यांना फारसा यश आले नाही. मात्र, यादरम्यान अनेक गावे आणि गावातील शाळा देखील उद्ध्वस्त झाली. त्यानंतर छत्तीसगड राज्यातील बस्तर, सुकमा, बीजापूर, दंतेवाडा, कांकेर, नारायणपूर,कोंडागाव आणि राजनंदगाव या जिल्ह्यात नक्षलवाद फोफावला. या भागात अजूनही विकासाचा सूर्योदय नाही. बीजापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात अनेक शाळा बंद होती. गावातील शाळा बंद असल्याने शाळाबाह्य मुलांची संख्या वाढत चालली होती. आदिवासीबहुल भागात प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी आणि गावातील पाटील, गायता, पेरमा यांना सोबत घेऊन जिल्हाधिकारी अनुराग पांडेय यांनी ‘फिर स्कुल चले अभियान’ सुरू केली आहे. याला बीजापूर जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळाला आहे.
यंदा नवीन शैक्षणिक वर्षात बिजापूर जिल्ह्यातील एकूण २४ बंद आणि ३२ नवीन शाळा सुरू करण्यात येत आहेत. त्यात डुमरीपालणार, तोडका, सावनार, कोरचोली, कावडगाव या गावांमध्ये तब्बल २० वर्षानंतर पुन्हा शाळेची घंटा वाजणार आहे. कावडगाव येथे नुकतेच काही महिन्यांपूर्वी येथे सीआरपीएफ कॅम्प लावण्यात आले. याठिकाणी नवीन कॅम्प लावल्याने पहिल्यांदाच गंगालुर ते मुदवेंडी पर्यंत पक्का रस्त्याचे काम पूर्ण झाले. याच रस्त्यावरील नक्षल्यांचा गड म्हणून ओळख असलेल्या कावडगावमध्ये एकेकाळी बंदुकीची दहशत होती. गोळ्यांचा आवाज यायचं. आता मात्र, तब्बल वीस वर्षानंतर येथे शाळेची घंटा वाजली आहे.
नुकतेच छत्तीसगड राज्यातील शाळा पूर्वव्रत सुरू करण्यात आल्या आहेत. २८ जून रोजी बीजापूरचे जिल्हाधिकारी अनुराग पांडेय यांच्याहस्ते कावडगांव येथील शाळेचे लोकार्पण करून विध्यार्थ्यांना पुस्तके, शालेय साहित्य वाटप करण्यात आले.या भागातील आदिवासी पालक सुद्धा मोठ्या उत्साहाने पाल्यांना घेऊन शाळेत पोहोचले. सध्या गावातील पालकांनीच बांबू पासून एक झोपडी तयार केली. या झोपडीत ही शाळा भरविण्यात येत असले तरी भविष्यात येथे सुसज्ज इमारतीचे बांधकाम केले जाणार असल्याचे जिल्हाधिकारी अनुराग पांडेय यांनी सांगितले. यावेळी विद्यार्थ्यांसोबत जिल्हाधिकाऱ्यांनी मध्यान भोजनाचा सुद्धा आस्वाद घेतला.
