नरेंद्र दाभोलकर खून खटला: काय घडले गेल्या ११ वर्षात
देशाला हादरवून टाकणारी घटना
अकरा वर्षांपूर्वी पुण्यात देशाला हादरवून टाकणारी एक घटना घडली होती. तारीख होती 20 ऑगस्ट 2013.अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रणेते, महाराष्ट्राच्या विवेकवादी चळवळीतले महत्वाचे कार्यकर्ते डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची याच दिवशी पुण्यातल्या महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावर गोळ्या झाडून हत्या झाली
डॉ. दाभोलकर 20 ऑगस्ट 2013 ला पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिराच्या मागच्या बाजूला असलेल्या महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावरून मॉर्निंग वॉकसाठी निघाले होते. यावेळी दबा धरून बसलेल्या दोघांनी दुचाकीवरून येत त्यांच्यावर गोळीबार केला. यामध्ये डॉ. दाभोलकरांचा जागीच मृत्यू झाला. गोळीबारानंतर दोन्ही आरोपी दुचाकीवरून पळून जाण्यात यशस्वी झाले.


यानंतर राज्यभरात आंदोलनं झाली. दाभोलकरांच्या मारेकऱ्यांना अटक करण्याची मागणी जोर धरू लागली. ‘’आम्ही सारे दाभोलकर’’ म्हणत सामाजिक चळवळीतील हजारो कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते.यामुळे तत्कालीन काँग्रेस–राष्ट्रवादी आघाडी सरकारवर दबाव वाढत गेला आणि पुणे पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला.
पुणे पोलिसांनी या प्रकरणात जानेवारी 2014 मध्ये पहिली अटक केली. ती कथित बंदूक विक्रेता मनिष नागोरी आणि त्याचा सहकारी विकास खंडेलवाल यांना. पण, याधीच्या प्रकरणात या दोघांचीही अटक वादग्रस्त ठरलेली होती. ठाणे पोलिसांनी 20 ऑगस्ट 2013 ला सायंकाळी चार वाजता खंडणीच्या प्रकरणात या दोघांना अटक केली होती. दाभोलकरांच्या हत्येनंतर काही तासांतच ही अटक झाली होती. ऑक्टोबर 2013 मध्ये नागोरी आणि खंडेलवाल यांना महाराष्ट्र एटीएसच्या ताब्यात देण्यात आलं. यावेळी त्यांच्याकडून 40 अवैध बंदुका जप्त केल्याचा दावा एटीएसने केला होता. यापैकी एक बंदुकीची मार्कींग ही दाभोलकरांच्या हत्या स्थळावरून जप्त केलेल्या काडतुसासोबत मिळती जुळती असल्याचं एटीएसचं म्हणणं होतं. एटीएसकडून ही माहिती मिळाल्यानंतर पुणे पोलिसांनी दोघांनाही अटक केली होती. पण, सुरुवातीला 2012 च्या पुणे विद्यापीठातील सुरक्षा रक्षकाच्या हत्येच्या आरोपाखाली ही अटक होती. त्यानंतर दाभोलकरांच्या हत्येचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला. पण, या प्रकरणात खरा ट्विस्ट आला तो 21 जानेवारी 2014 ला.
कारण, यावेळी या दोन्ही आरोपींनी कोर्टात एटीएस प्रमुखांवरच आरोप केले होते. एटीएस प्रमुख राकेश मारिया यांनी दाभोलकर हत्येचा गुन्हा कबूल करण्यासाठी 25 लाख रुपयांची ऑफर दिली होती, असा दावा आरोपींनी कोर्टात केला होता.पण, त्यानंतरच्या सुनावणीत हे आरोप जाणीवपूर्वक केल्याचं त्यांनी मान्य केलं होतं. पुणे पोलिसांनी या दोघांविरोधात आरोपपत्रपही दाखल केलं नव्हतं.या दोन्ही आरोपींचा या प्रकरणासोबत काहीही संबंध नसल्याचं समोर आलं. त्यानंतर कोर्टाने या दोन्ही आरोपींची जामिनावर सुटका केली.



Advertisement
