केजरीवाल आणि कविता यांना दिलासा नाही
न्यायालयाकडुन ७ मेपर्यंत कोठडीत वाढ
नवी दिल्ली
दिल्ली दारू घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि बीआरएस नेत्या के. कविता यांना दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टाने मोठा झटका दिला आहे. अरविंद केजरीवाल आणि के. कविता यांच्या न्यायालयीन कोठडीमध्ये ७ मेपर्यंत वाढ करण्यात आली आहे. अरविंद केजरीवाल आणि के. कविता यांची न्यायालयीन कोठडी संपल्यानंतर आज कोर्टाने व्हिडीओ कॉन्फर्न्सिंगद्वारे सुनावणी केली. या सुनावणीदरम्यान ईडीने कोर्टाला लवकरच के. कविता प्रकरणाचे आरोपपत्र सादर करु असे सांगितले.
अरविंद केजरीवाल आणि के. कविता यांना आजही कोर्टाकडून दिलासा मिळाला नाही. अरविंद केजरीवाल आणि के. कविता यांच्या न्यायलयीन कोठडीत ७ मे पर्यंत वाढ करण्यात आली आहे. पुढची सुनावणी ७ मे रोजी होणार आहे. या दिवशी दुपारी २ वाजता व्हिडीओ कॉन्फर्न्सिंगद्वारे केजरीवाल यांना कोर्टात हजर करण्याच्या सूचना कोर्टाने दिल्या आहेत.आज न्यायालयीन कोठडी संपल्यानंतर तपास यंत्रणा ईडीने के. कविता यांच्या न्यायालयीन कोठडी वाढ करण्यासाठी कोर्टात अर्ज दाखल करत साक्षीदारांवर प्रभाव टाकून पुराव्यांशी छेडछाड होण्याची भीती व्यक्त केली होती. ईडीने कोर्टाला सांगितले की, आम्ही या प्रकरणाचा तपास करत आहोत. ६० दिवसांच्या आतमध्ये आम्ही के कविता यांच्याविरोधात आरोपपत्र सादर करणार आहोत. के कविता यांचे वकील नितेश राणा यांनी न्यायालयीन कोठडी वाढवण्याच्या कोर्टाच्या आदेशाचा विरोध केला आहे.के कविता यांच्यानंतर ई़डीने अरविंद केजरीवाल आणि चरप्रीत सिंह यांच्या प्रकरणात देखील न्यायालयीन कोठडीत वाढ करण्याची मागणी केली. त्यानंतर कोर्टाने आजच्या सुनावणीदरम्यान के. कविता, अरविंद केजरीवाल आणि चरप्रीत सिंह या तिन्ही प्रकरणात न्यायालयीन कोठडीत ७ मे पर्यंत वाढ करण्याचा निर्णय घेतला. या सर्वांना ७ मे रोजी दुपारी २ वाजता कोर्टात हजर केले जाणार आहे.
