राज ठाकरेंचा महायुतीला बिनशर्त पाठिंबा
विधानसभेच्या तयारीला लागण्याचे कार्यकर्त्यांना आदेश
मुंबई
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्ष,शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्या महायुतीला बिनशर्त पाठिंबा डर्ट असल्याचे जाहीर केले आहे. हा पाठिंबा फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी असल्याचा खुलासा त्यानी केला आहे गुढीपाडव्यानिमित्त राज ठाकरे यांनी मुंबईतल्या शिवाजी पार्क येथे भाषण केलं. या भाषणावेळी त्यांनी हि घोषणा केली
नरेंद्र मोदी यांच्याकडे पाहून आपण या लोकसभा निवडणुकीवेळी बिनशर्त पाठिंबा देत असल्याचे राज यांनी सांगितले.देशाला खंबीर नेतृत्वाची गरज आहे. चांगल्या भविष्यासाठी हा पाठिंबा देत आहे. मला काही नको, मोदींसाठी फक्त बिनशर्त पाठिंबा देत असल्याचं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.
राज ठाकरे यांनी अमित शाह यांच्या भेटीवेळी माध्यमांनी ज्या प्रकारे बातम्या दिल्या त्यावर सडकून टीका केली.दिल्लीत पोहोचल्यानंतर अमित शाह यांची भेट दुसऱ्या दिवशी ठरली होती. तरीही राज ठाकरेंनी अमित शाह यांच्या भेटीसाठी अनेक तास वाट पाहावी लागली, अशा बातम्या चालवल्या, यावर राज ठाकरेंनी नाराजी व्यक्त केली.त्यांनी दिल्लीवारीची चर्चा केली. माध्यमातील चर्चेंना विराम देण्यासाठी गोटातील माहिती दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी त्यांचे गेल्या एक वर्षांपासून चांगले सूर जुळल्याचे दिसत होते. त्यावर राज ठाकरे यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली. शिंदे आणि फडणवीस यांनी काय साकडं घातलं हे त्यांनी स्पष्ट केले.
वर्ष दीड वर्ष झाली. मुख्यमंत्री माझ्याशी बोलतात. आपण एकत्र आलं पाहिजे. एकत्र काही तरी केलं पाहिजे. असं वर्ष दीड वर्ष ऐकतोय. फडणवीस आणि शिंदे सांगत होते एकत्र आलं पाहिजे. म्हटलं म्हणजे काय. मग त्यात विषय निघाले. म्हणून अमित शाह यांना फोन केला आणि म्हटलं मला भेटायचं. काय चाललंय मला समजायचं आहे. मग आमचं बोलणं झालं, अशी माहिती राज ठाकरे यांनी दिली.
राज ठाकरे म्हणाले , कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवू नका. मी कोणत्याही शिवसेनेचा प्रमुख अध्यक्ष होणार नाही. मी जे मनसे नावाचं अपत्य जन्माला घातलंय त्याचाच मी अध्यक्ष राहणार. तुमच्या विश्वासावर पक्ष उभा केला. आता जोरात विधानसभेच्या कामाला लागा.
