पुण्यात २० हजार किलोची मिसळ
फुले-आंबेडकर जयंतीनिमित्त प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांचा उपक्रम
पुणे
तिखट, झणझणीत मिसळ आणि पाव हा महाराष्ट्राच्या खाद्य संस्कृतीमधील महत्वाचा आणि लोकप्रिय पदार्थ. खवय्यांसाठी मिसळ नेहमीच आकर्षणाचा विषय असते.आता पुण्यात तब्बल २० हजार किलोची मिसळ बनवण्यात येणार आहे. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शेफ विष्णू मनोहर ही मिसळ बनवणार आहेत. मनोहर यांनी अयोध्येत तब्बल ७ हजार किलोचा विश्वविक्रमी शिरा बनवला होता. आता पुण्यात चटकदार मिसळ बनवून ते विक्रम करणार आहेत.

क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त तब्बल २० हजार किलोंची मिसळ तयार करण्यात येणार आहे.
संयोजन समितीने दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही महापुरुषांच्या जयंतीनिमित्ताने ११ आणि १४ एप्रिल रोजी अनुक्रमे गंज पेठेतील महात्मा ज्योतिबा फुले वाडा आणि पुणे रेल्वे स्टेशन रस्ता येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे अभिवादनासाठी येणाऱ्या नागरिकांना मिसळ वाटप करण्यात येणार आहे.
क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले वाडा येथे गुरुवारी (ता. ११) १० हजार किलो मिसळ आणि जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे १४ एप्रिल सकाळी ७ पासून १० हजार किलो मिसळ तयार करून वाटप करण्याचा उपक्रम होणार आहे.
शेफ विष्णू मनोहर यांनी अयोध्येत ७ हजार किलोचा विश्वविक्रमी शिरा बनविण्यासाठी वापरलेली अजस्त्र कढई पुण्यात मिसळ बनविण्यासाठी वापरण्यात येणार आहे. १५ बाय १५ फूट आकाराची ही भव्य कढई आहे. तिची उंची ६.५ फूट तर वजन २५०० किलो आहे.
२० किलोच्या मिसळसाठी लागणारे साहित्य-
मटकी २ हजार किलो कांदा १६०० किलो आलं ४०० किलो लसूण ४०० किलो तेल १४०० किलो मिसळ मसाला २८० किलो लाल मिरची पावडर ८० किलो
हळद पावडर ८० किलो मीठ १०० किलो खोबरा कीस २८० किलो तमाल पत्र १४ किलो फरसाण ५००० किलो पाणी २०००० लिटर कोथिंबीर २५० जुडी लिंबू २००० नगस्लाईड ब्रेड ३ लाख
