काँग्रेसमध्ये श्वास गुदमरतोय
राजू वाघमारे यांचा गंभीर आरोप
मुंबई
काँग्रेसचे नेते आणि प्रवक्ते राजू वाघमारे यांनी काँग्रेसचा हात सोडून शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेतला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत राजू वाघमारे यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. यानंतर त्यांनी प्रथमच आपली भूमिका जाहीर केली. “काँग्रेस पक्षाची सध्याची स्थिती बघता कोणाचाही पायपोस कोणात राहिला नाही. संपूर्ण काँग्रेस पक्ष वेगळ्या वातावरणामध्ये आहे. कार्यकर्त्यांचा श्वास गुदमरतोय, महाराष्ट्रातल्या काही नेत्यांच्या स्वार्थी आणि गलिच्छ राजकारणामुळे माझ्यासारख्या निष्ठावान कार्यकर्त्याला पक्ष सोडावा लागत आहे. तन-मन-धनाने मी गेल्या ३५ वर्षांपासून काँग्रेसची सेवा केला. माझ्यासारखा कार्यकर्ता या विचारापर्यंत येतो. तेव्हा त्यात नक्कीच काहीतरी गडबड आहे, हे सिद्ध होते”, अशी प्रतिक्रिया राजू वाघमारे यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
“काँग्रेसमध्ये नेत्यांचे आपपासात गटतटाचे राजकारण आहे. कार्यकर्त्यांकडे कोणाचे लक्ष नाही. इतके वर्ष काम करून पक्ष जर तुमच्याकडे पाहत नसेल तर मग त्यांनी काय करायचे? मी एकटाच नाही. मी गुढीपाडव्याच्या दिवशी सुरुवात करतोय. माझ्यासारखे हजारो कार्यकर्ते यापुढे निर्णय घेतील. कार्यकर्त्यांचा श्वास गुदमरतोय, त्यांना विचारणारे कुणी नाही. जे प्रस्थापित नेते आहेत, ज्यांची पोटं भरलेली आहेत. त्यांना पक्षाचे किंवा कार्यकर्त्यांचे काही पडलेले नाही. त्यामुळे मी महाराष्ट्राच्या विकासासाठी झटणाऱ्या मुख्यमंत्र्यांची साथ देण्याचा निर्णय घेतला”, अशी भावना राजू वाघमारे यांनी बोलून दाखवली.
राजू वाघमारे पुढे म्हणाले, “महाविकास आघाडीत जर आघाडी असती तर जागावाटप करण्यासाठी इतका वेळ लागला नसता. काँग्रेसच्या परंपरागत मतदारसंघावर भिवंडी आणि सांगलीमध्ये जर उद्धव ठाकरे गट आणि शरद पवार गट जर उमेदवार जाहीर करत असतील तर यापेक्षा वेगळे काँग्रेसचे दुर्दैव ते कोणते? त्यामुळे ही आघाडी पुढे कायम राहिल, असे वाटत नाही.”
“राजकारणात जेव्हा एखादी व्यक्ती येते, तेव्हा त्याच्या काही अपेक्षा असतात. इच्छा नसणाऱ्या व्यक्ती राजकारणात येत नाहीत. मी अमेरिका सोडून भारतात आलो होतो. काँग्रेसमध्ये असताना मी खूप मेहनत केली. प्रवक्ता म्हणून विरोधकांना अंगावर घेत होतो. पण काँग्रेसमधील काही निवडक नेते माझ्यासारख्या कार्यकर्त्याची गळचेपी करतात. माझ्यासारख्या असंख्या कार्यकर्त्यांची गळचेपी करतात. अशा नेत्यांमुळेच माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मार्ग बदलल्याशिवाय पर्याय नाही. माझ्यासारख्या अनुसूचित जातीच्या कार्यकर्त्याची अशामुळे प्रगती होऊ शकत नाही. त्यामुळे मी नाईलाजाने पक्ष सोडत आहे”, असे राजू वाघमारे यांनी सांगितले
