संगीत माणसाला वेगळ्या दुनियेत नेऊन शांतता देते : अविनाश कदम


‘आप की पसंद’ कार्यक्रमात कलाकारांच्या बहारदार गीतांनी रंगली मैफल

Advertisement

सातारा,
“संगीत माणसाला एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जाते. त्यामुळे मनाला शांतता मिळते आणि मेंदूदेखील शांत होतो.सगळ्या कलाकारांनी फारच सुंदर गीते सादर केली. मुकुंद पांडे सरांनी अतिशय चांगला ग्रुप तयार केला आहे ,” असे प्रतिपादन सातारा जिल्हा पत संस्था फेडरेशन चेअरमन,माजी उपनगराध्यक्ष आणि सातारा नगरपरिषदेचे ज्येष्ठ नगरसेवक अविनाश कदम यांनी केले.
‘आम्ही आनंद यात्री’ आणि दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था यांच्या संयुक्त विद्यमाने दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था सभागृह, येथे नुकतेच ‘आप की पसंद’ या संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कदम बोलत होते.
कार्यक्रमास पत संस्था फेडरेशनचे व्हाईस चेअरमन शशिकांत पवार, हेमंत कासार,मुकुंद पांडे आणि शिरीष चिटणीस प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाची संकल्पना मुकुंद पांडे यांची होती. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कलाकारांनी हिंदी-मराठी गीतांची सुरेल मेजवानी सादर करून रसिकांची दाद मिळवली.
यावेळी बोलताना अविनाश कदम यांनी साताऱ्यातील सांस्कृतिक चळवळीला चालना देण्यासाठी सुरू असलेल्या विविध प्रयत्नांची माहिती दिली. शाहू कला मंदिराच्या सुमारे ८० कोटी रुपयांच्या पुनर्विकासाचा महत्त्वपूर्ण प्रकल्प हाती घेण्यात आला असून, त्यातून आधुनिक आणि सुसज्ज सांस्कृतिक केंद्र उभारण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. हौशी कलाकारांना आर्थिक अडथळ्यांशिवाय आपली कला सादर करता यावी, यासाठी सर्वांना सहज उपलब्ध होतील अशी सांस्कृतिक व्यासपीठे निर्माण करण्यावर भर दिला जात असल्याचेही त्यांनी नमूद केले.
“सातारा आणि परिसराची समृद्ध साहित्यिक व सांगीतिक परंपरा पुढील पिढ्यांपर्यंत जिवंत राहणे आवश्यक आहे. राजकीय पाठबळ आणि तळागाळातील कलाकारांची सर्जनशीलता यांचा समन्वय साधून समाजामध्ये सांस्कृतिक चैतन्य, कलाप्रेम आणि एकात्मतेची भावना निर्माण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत,” असेही कदम यांनी सांगितले.
शिरीष चिटणीस यांनी आपल्या मनोगतात, “तुमच्याकडे जे जे आहे ते लोकांपर्यंत पोहोचावे, हा आपला उद्देश आहे. सर्वांना एकत्र आणण्याचे संगीत हे प्रभावी माध्यम झाले आहे,” असे सांगितले. विविध क्षेत्रांतील कलाकारांना एकत्र आणून त्यांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळवून देणे ही या उपक्रमामागची भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
‘आप की पसंद’ कार्यक्रमात मुकुंद पांडे, लक्ष्मीकांत अघोर, प्रशांत कुलकर्णी, आशुतोष देशपांडे, अरुण कुलकर्णी,शशीकांत पवार, शिरीष चिटणीस आणि आशुतोष वाळिंबे तसेच प्रिया अघोर, विजया चव्हाण, रेश्मा वाळिंबे आणि गायत्री देशपांडे यांनीही सुरेल गीते सादर केली. स्नेहल कुलकर्णी यांनी प्रभावी निवेदनातून कार्यक्रमाची रंगत वाढवली, तर कुलदीप पवार यांनी ध्वनी व्यवस्था सांभाळली.
कलाकारांच्या बहारदार सादरीकरणाला रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. विविध लोकप्रिय गीतांनी सभागृहात संगीताचा माहोल निर्माण झाला. संगीताच्या माध्यमातून कलाकार, रसिक आणि समाज यांना एकत्र आणण्याच्या या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!