नामांकित कंपनीत महिलांचा लैंगिक छळ


धर्मांतरासाठी दबाव ,बीफ’ खाण्यास भाग पाडले

नाशिक :
नाशिकमध्ये एका प्रसिद्ध बहुराष्ट्रीय कंपनीत (MNC) काम करणाऱ्या तरुणींना अत्यंत भयानक अनुभवांना सामोरे जावे लागल्याचे समोर आले आहे. आर्थिक अडचणीत असलेल्या आणि नोकरीची नितांत गरज असलेल्या गरजू महिलांचा गैरफायदा घेत, त्यांच्यावर केवळ लैंगिक अत्याचारच करण्यात आले नाहीत, तर त्यांच्या धार्मिक भावनांनाही जाणीवपूर्वक ठेच पोहचवण्यात आली आहे. या संतापजनक प्रकारामुळे शहरात तीव्र संताप व्यक्त होत असून, पीडित महिलांना देण्यात आलेल्या या ‘नरकयातनां’ची तक्रार प्राप्त होताच प्रशासकीय यंत्रणा सतर्क झाली आहे. या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यासाठी प्रशासनाने आता पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. एका नामांकित कंपनीच्या आवारात घडलेल्या या प्रकारामुळे महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

येथील एका नामांकित कंपनीत गेल्या चार वर्षांपासून सुरू असलेल्या महिलांच्या शोषणाचे धक्कादायक वास्तव आता समोर आले आहे. प्रामुख्याने १८ ते २५ वयोगटातील तरुण आणि गरजू महिलांना लक्ष करून त्यांचे मानसिक व शारीरिक खच्चीकरण केले जात असल्याचे उघड झाले आहे. आर्थिक ओढग्रस्ततेमुळे नोकरीची गरज असलेल्या या तरुणींचा फायदा घेत, २०२२ पासून हा अमानवीय प्रकार सुरू असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. केवळ कामाच्या ठिकाणचे शोषणच नव्हे, तर या तरुणींवर विशिष्ट धार्मिक कृत्ये करण्यासाठी सक्ती केली जात होती. यामध्ये नमाज पठणाची सक्ती, धर्मांतरासाठी दबाव आणणे आणि इतकेच नव्हे तर आहारविषयक धार्मिक भावना पायदळी तुडवत ‘बीफ’ खाण्यास भाग पाडणे अशा संतापजनक प्रकारांचा समावेश आहे. सुरक्षित वातावरणाऐवजी नरकयातना देणाऱ्या या कंपनी प्रशासनाविरोधात आता संतापाची लाट उसळली असून, या ‘धार्मिक आणि शारीरिक’ छळाची सखोल चौकशी सुरू करण्यात आली आहे.
या धक्कादायक घटनेत आतापर्यंत नऊ स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले असून पोलिसांनी सहा मुख्य आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. यामध्ये मुंबई नाका पोलीस ठाण्यात विनयभंग, धार्मिक भावना दुखावणे आणि अत्याचाराचे गुन्हे नोंदवण्यात आले आहेत, तर देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणात आसिफ अन्सारी, शफी शेख, शाहरुख कुरेशी, रजा मेमन आणि तौसिफ अत्तार या पाच पुरुष आरोपींसह एका साथिदाराला अटक केली आहे. या टोळीतील एक महिला आरोपी सध्या पोलिसांना गुंगारा देत असून तिचा शोध सुरू आहे. अटक केलेल्या सर्व आरोपींना न्यायालयात हजर केले असता, त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या कारवाईमुळे पीडित महिलांना न्याय मिळण्याच्या आशा पल्लवीत झाल्या असून, पोलीस या प्रकरणाच्या मुळापर्यंत जाण्यासाठी कसून तपास करत आहेत.

Advertisement

प्रसिद्ध बहुराष्ट्रीय कंपनीतील अमानवीय छळ आणि धार्मिक शोषणाचे गांभीर्य लक्षात घेऊन नाशिक पोलिसांनी आता ‘विशेष तपास पथकाची’ (SIT) स्थापना केली आहे. सहाय्यक पोलीस आयुक्तांच्या नेतृत्वाखाली हे पथक या प्रकरणाच्या मुळाशी जाणार आहे. तपासादरम्यान केवळ महिलाच नाही, तर एका पुरुष कर्मचाऱ्यालाही जबरदस्तीने धर्मांतर करण्यास भाग पाडल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाल्याने या रॅकेटची व्याप्ती मोठी असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या घटनेचे पडसाद उमटल्यानंतर प्रशासनाने शहरातील सर्व खासगी कंपन्यांना कडक निर्देश दिले आहेत. प्रत्येक कंपनीत ‘अंतर्गत तक्रार निवारण समिती’ तात्काळ सक्रिय करणे अनिवार्य करण्यात आले आहे. दरम्यान, पोलीस प्रशासनाने पीडित महिलांना न घाबरता पुढे येण्याचे आवाहन केले आहे. तक्रारदाराची ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवली जाईल, अशी ग्वाही स्वतः पोलीस आयुक्तांनी दिली आहे. कोणत्याही पीडित महिलेला तक्रार करायची असल्यास त्यांनी पोलीस आयुक्तांच्या व्हॉट्सॲप क्रमांकावर किंवा 112 या कंट्रोल रूम क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. पोलीस आयुक्तांनी स्वतः या प्रकरणात लक्ष घातले असून, पीडित महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी पोलीस दल कटीबद्ध असल्याचे सांगितले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!