कोण होणार चॅम्पियन
भारत न्यूझीलंड यांच्यातील अंतिम सामना दुबईत रंगणार
दुबई
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत भारत आणि न्यूझीलंड यांच्यात 9 मार्चला दुबईत सामना होणार आहे दोन्हीही संघ तुल्यबळ असल्याने कोण होणार चॅम्पियन याबाबत उत्सुकता आहे
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताचा आतापर्यंत पराभव झाला नाही. पण, 9 मार्चला दुबईच्या मैदानावर होणारा न्यूझीलंड सोबतचा अंतिम सामना भारतासाठी आव्हानात्मक ठरू शकतो.याआधीही 25 वर्षांपूर्वी आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीत भारत विरुद्ध न्यूझीलंड असा अंतिम सामना झाला होता. 2000 साली आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंड आणि भारत यांच्यात चुरशीची लढत झाली होती.त्या रोमांचक सामन्यात भारतानं दिलेल्या 265 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत न्यूझीलंडनं चार गडी राखून विजय मिळवला होता.सामन्याच्या शेवटच्या ओव्हरपर्यंत भारतीय संघानं चिकाटीनं लढत दिली, पण शेवटी 2 बॉल शिल्लक असताना न्यूझीलंडनं भारताला नमवलं.पण, मर्यादित ओव्हरच्या टूर्नामेंटमध्ये न्यूझीलंडचं हे एकमेव विजेतेपद आहे. त्यावेळी भारतीय संघानं भलेही ही संधी गमावली असेल, पण, पुढे भारतीय संघानं मर्यादित ओव्हरची ही टूर्नामेंट पाच वेळा जिंकून दाखवली. यामध्ये भारतानं दोनवेळा चॅम्पियन्स ट्रॉफीही पटकावली आहे.
न्यूझीलंडची आयसीसी टूर्नामेंटमध्ये त्यांची कामगिरी चांगली आहे.2007 पासून 2023 पर्यंत न्यूझीलंड संघानं प्रत्येकवेळी वनडे वर्ल्ड कपचा सेमीफायनल किंवा फायनलचा सामना खेळलाय.मर्यादित ओव्हर्सच्या आयसीसी टूर्नामेंटमध्ये भारत विरुद्ध न्यूझीलंड सामना 16 वेळा झाला. यामध्ये 6 वेळा भारतीय संघाचा विजय झाला, तर 9 वेळा न्यूझीलंडचा विजय झाला.दोन्ही संघामधील एक सामना अनिर्णित राहिला आहे.9 मार्चला न्यूझीलंड संघ तिसऱ्यांदा आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना खेळणार आहे. पण, भारताकडे अंतिम सामना खेळण्याचा जास्त अनुभव आहे.
भारतीय संघ 9 मार्चला पाचव्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये उतरणार आहे.गेल्या सहा वर्षांत 2 वेळा भारत आणि न्यूझीलंडमध्ये आयसीसी वनडे वर्ल्ड कप सेमीफायनलचा सामना झालाय.2019 मध्ये मॅट हेनरीने भारताला अंतिम सामन्यात जाण्यापासून रोखलं होतं. हाच हेनरी या सामन्यात भारतासाठी सर्वात मोठं आव्हान ठरला.2019 च्या वर्ल्ड कप सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडनं भारताला 18 धावांनी मात दिली होती, तर 2023 च्या वनडे वर्ल्ड कप सेमीफायनलमध्ये भारतानं 70 धावांनी विजय मिळवत जुना हिशोब चुकता केला होता.
9 मार्चला भारत आणि न्यूझीलंड यांच्यापैकी कोणताही संघ विजयी होऊ शकतो. पण या आकडेवारीचा विचार केल्यास दोन्ही संघात चुरशीचा सामना होण्याची शक्यता आहे