बालकुमार साहित्य संमेलन म्हणजे संस्कारपीठ:महेश सोनवणे 


१८ वे मराठी बालकुमार साहित्य संमेलन उत्साहात संपन्न

Advertisement

सातारा
18 बालकुमार साहित्य संमेलन म्हणजे केवळ गोष्टी, कविता किंवा नाटिका नव्हे,तर ते उद्या घडवणाऱ्या पिढीचे संस्कार पीठ आहे असे प्रतिपादन महेश सोनवणे यांनी केले .
अमरेंद्र भास्कर मराठी बालकुमार साहित्य संस्था पुणे शाखा सातारा व लोकमंगल ग्रुप शिक्षण संस्था सातारा आणि लोकमंगल हायस्कूल एम .आय .डी .सी . सातारा आयोजित 18 वे मराठी बालकुमार साहित्य संमेलनाच्या संमेलनाध्यक्ष पदावरून महेश सोनवणे बोलत होते .यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून डॉ . दिलीप गरुड कार्यवाह अमरेंद्र भास्कर मराठी बालकुमार साहित्य संस्था पुणे यांची उपस्थिती होती .कार्यक्रमास लोकमंगल ग्रुप शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शिरीष चिटणीस तसेच शिल्पा चिटणीस अध्यक्षा अमरेंद्र भास्कर मराठी बालकुमार साहित्य संस्था शाखा सातारा यांची यावेळी उपस्थिती होती .
महेश सोनवणे पुढे म्हणाले बालवयात जे संस्कार मनावर कोरले जातात, ते आयुष्यभर मार्गदर्शक ठरतात. चांगले साहित्य मुलांच्या मनात विचारांची बीजे पेरते, कल्पनाशक्तीला उधाण आणते आणि माणूसपणाची जाणीव निर्माण करते. आजच्या स्पर्धेच्या, तंत्रज्ञानाच्या युगातही मराठी बाल साहित्याची गोडी टिकून आहे, ही अत्यंत समाधानाची गोष्ट आहे.
शिरीष चिटणीस म्हणाले, परिस्थितीतून माणूस घडतो आणि शिकतो. माजी विद्यार्थ्यांचे मनोगत विद्यार्थ्यांना भावतात . शालेय जीवनात जे मिळते ते चिरकाल टिकत असते . शालेय जीवन आनंददायी असते . साहित्याची आवड बालकुमार साहित्यातूनच मिळत असते, विद्यार्थ्यांना आपल्या आठवणी साठवून ठेवता येतात .शाळा शिकवते मी काय करेन आई-वडील भाऊ-बहीण समाजासाठी काहीतरी करायला शाळा शिकवत असते . पुस्तकी ज्ञानाबरोबर सामाजिक भान राखण्यासाठी शाळेमधून आचार विचार विद्यार्थ्यांच्या अंगी उतरवले जातात. बालकुमार साहित्य संमेलनातून विद्यार्थ्यांना विविध कलागुणांना वाव देण्यासाठी प्रोत्साहन मिळत असते .
डॉ . दिलीप गरुड म्हणाले, शाळा हे संस्कारपीठ असते शाळेतून विद्यार्थ्यांच्या अंगी विविध कार्यक्रमाद्वारे वेगवेगळे आचार विचार उतरवले जातात . भाषण, गप्पागोष्टी, गाण्यातून विद्यार्थी घडतात. समाजात विचार कसे मांडले पाहिजे हे त्याच्यातून समजते . थोरामोठ्यांचे विचार आत्मसात करता येतात म्हणून शालेय स्तरावर बालकुमार साहित्य संमेलने आयोजित केली जावीत .लोकमंगल ग्रुप शिक्षण संस्थेच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी बालकुमार साहित्य संमेलनाचे आयोजन करत असल्याबद्दल त्यांनी कौतुक केले .
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापिका विद्या बाबर यांनी केले .यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या नाटयछटा, कविता, पोवाडा,कथाकथन, मी वाचलेले पुस्तक याच्यावर मनोगते व्यक्त केली काही विद्यार्थ्यांनी नृत्य सादर करून वाहवा मिळवली .
यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या मराठी, हिंदी आणि इंग्रजी विषयांच्या हस्तलिखितांचे प्रकाशन संपन्न झाले .
कार्यक्रमास विद्यालयाचे जेष्ठ शिक्षक विजय यादव, उदय जाधव, काकासो निकम, संगीता कुंभार, प्रतिभा वाघमोडे, बाळकृष्ण इंगळे,यशवंत शिलवंत,वैशाली वाडीले, देवराम राऊत, सतीश पवार, चंद्रकांत देवगड, विजय गव्हाळे,पालक वर्ग यांची उपस्थिती होती .
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गुलाब पठाण, सिमरन वायदंडे,पायल महाडिक,भास्कर जाधव यांनी केले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!