वैज्ञानिक दृष्टिकोन भारताला ‘विश्वगुरू’ बनवेल
सांस्कृतिक व्याख्यानमालेत अविनाश धर्माधिकारी यांचे प्रतिपादन
पुणे
युवकांच्या सशक्ततेचा वापर, वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अंगीकार,आणि शाश्वत मूल्यांचा पुनरुज्जीवन हे स्वामी विवेकानंदांचे विचार भारताला ‘विश्वगुरू’ बनवू शकतात असे प्रतिपादन निवृत्त सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांनी केले.
भारतीय संस्कृती संगम,पुणे आणि आयडियल सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सांस्कृतिक व्याख्यानमालेच्या तिसऱ्या पुष्पात अविनाश धर्माधिकारी यांनी ‘स्वामी विवेकानंदांच्या स्वप्नातील भारत’ या विषयावर आपले विचार मांडले. १२ जानेवारीला माँ जिजाऊ आणि स्वामी विवेकानंदांची जयंती साजरी केली जाते.” जिजाऊंनी महाराष्ट्राला भारतासाठी लढायला शिकवले,तर स्वामी विवेकानंदानी आपल्या विचारांद्वारे भारतीय समाजाला आणि जगाला एक नवा दृष्टिकोन दिला,” असे ते म्हणाले.
अविनाश धर्माधिकारी म्हणाले,आजकाल आपल्या स्वयं-घोषित ‘पुरोगामी’ धोरणनिर्मात्यांना पाश्चात्य विचारवंतांचे संदर्भ देण्याची आवड असली तरी,ते आपल्या देशातील महान विचारवंतांकडून शिकण्यास कधीही तयार नसतात. स्वामी विवेकानंद यांच्या शिकवणीतील विद्रोह हा बौद्धिक आणि उत्पादक होता,विध्वंसक नव्हता त्याचबरोबर,स्वामीजींच्या ‘विविधतेत एकता’ या संकल्पनेतून ‘अनेकतेत एकत्व’ पाहण्याची क्षमता निर्माण केली जाते.
अध्यक्षीय भाषणात महाराष्ट्राचे निवृत्त पोलीस महासंचालक जयंत उमराणीकर यांनी स्वामी विवेकानंद यांच्या कार्याची महती सांगितली आणि त्यांचे कार्य भारतीय समाजासाठी किती महत्वाचे आहे, हे स्पष्ट केले.
प्रारंभी, डॉ ऋचा पंडित यांनी “हे वीर विवेकानंद …” हे वैयक्तिक गीत गायले,कार्यक्रमाची सांगता मधुरा वैशंपायन यांनी गायिलेल्या संपूर्ण “वंदे मातरम” ने झाली.

