भाजपकडून आता विरोधकांना रोज प्रत्युत्तर
सकाळी मुंडे-दानवे,संध्याकाळी महाजन-मुनगंटीवार
मुंबई
लोकसभेच्या निवडणुकीत विरोधकांच्या प्रचाराचा फटका बसलेल्या भाजपने आता विधानसभेच्या तोंडावर सावध पावले उचलत विरोधकांना जशास तसे प्रत्युत्तर देण्याचं ठरवलं आहे. भाजपकडून आता रोज सकाळ-संध्याकाळ विरोधकांच्या टीकेवर प्रत्युत्तर देण्यात येणार आहे.त्यासाठी दहा जणांची फायरबँड टीम तैनात करण्यात आली आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी ही घोषणा केली आहे.


भाजपकडून रोज सकाळी 9 वाजता प्रतिक्रिया देण्यासाठी चार जणांची टीम जाहीर करण्यात आली आहे. त्यामध्ये नवनिर्वाचित आमदार पंकजा मुंडे, आशिष शेलार, प्रवीण दरेकर आणि माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचा समावेश आहे.तर संध्याकाळी 4 वाजता प्रतिक्रिया देण्यासाठी भाजपकडून 6 जणांची टीम तैनात करण्यात आली असून त्यामध्ये राज्याचे मंत्री सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, माधव भंडारी, चव्हाण, अतुल भातखळकर आणि राम कदम हे सहा नेते प्रतिक्रिया देणार आहेत.
विभागवार बोलण्यासाठीही भाजपकडून 20 नेत्यांच्या तगड्या टीमची घोषणा करण्यात आली आहे. भाजपच्या विभागीय टीममध्ये केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, माजी केंद्रीय मंत्री भारती पवार यांचा समावेश आहे.लोकसभेच्या निवडणुकीत बसलेला फटका लक्षात घेता विधानसभेच्या निवडणुकीत भाजपने जास्तीत जास्त म्हणजे 170 ते 180 जागा लढाव्यात असा आग्रह पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी धरल्याची माहिती आहे. महाराष्ट्र प्रभारी, केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव, केंद्रीय मंत्री आश्विनी वैष्णव यांच्या अध्यक्षतेखाली भाजपच्या कोअर कमिटीची बैठक मुंबईत झाली.
