सरकार पक्षाने अपिलात जावे:मांडके
डॉ नरेंद्र दाभोलकर खून खटला निकालावर असमाधान व्यक्त
सातारा
सामाजिक कार्यकर्ते व विचारवंत शहीद डॉ नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाच्या खटल्याचा पुण्याच्या विशेष न्यायालयाने आज निकाल दिला आहे. त्या निकालावर आम्ही व्यवस्था परिवर्तनाच्या चळवळीतील कार्यकर्ते व डॉ .नरेंद्र दाभोलकर यांचे समाजवादी युवक दलातील सहकारी अजिबात समाधानी नाही. सरकारी पक्षाने या निकालावर अपिलात जावे तसेच डॉ नरेंद्र दाभोलकर खुन प्रकरणाचा मास्टरमाईंड हा शोधावाच लागेल आणि त्याला शिक्षाही झालीच पाहिजे असे आम्हाला वाटते अशी प्रतिक्रिया विद्रोही सांस्कृतिक चळवळ , महाराष्ट्र उपाध्यक्ष , विजय मांडके यांनी व्यक्त केली आहे
मुंबई उच्च न्यायालयाच्या निगराणीखाली तपास केला जातो. डॉ दाभोलकर कुटुंबीयांना यात न्यायालयाचे दार ठोठवावे लागते. यातच तपास यंत्रणेचे अपयश आहे असे नाईलाजाने म्हणावेसे वाटते. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे यामध्ये तपास यंत्रणांकडुन एखाद्या खून खटल्यात ज्याप्रमाणे तपास केला जातो. त्याच पद्धतीने यात केला आहे असे म्हणावेसे वाटते. पारंपारिक पद्धतीने केलेला तपास मुळात चुकीच्या पद्धतीने आहे. कारण डॉ नरेंद्र दाभोलकर हे विषम व्यवस्था परिवर्तनाची विशिष्ट विचारधारा घेऊन चाललेले होते आणि त्यांचा खून हा विशिष्ट विचाराच्या सनातन प्रवृत्तींनी केलेला आहे. तपास यंत्रणांनी याच्या संदर्भात या खुनाचा तपास करताना विचारच केला नाही. न्यायालयाने दिलेल्या निकालाचा विचार करता यात मास्टर माईंड पूर्णपणे सुटलेले दिसत आहेत.असेही मांडके यांनी म्हटले आहे
पूर्णपणे निकाल पत्र वाचल्यानंतर अधिक बोलता येईल. सुरुवातीपासूनच तपास यंत्रणांनी व त्या त्या वेळच्या सरकारांनी याकडे गांभीर्याने पाहिले नाही. याचाच परिणाम हा या निकालावर झालेला दिसून येतो. त्यामुळे सरकारी पक्षाने यात वेळ न घालवता अपिलात जावे व या प्रकरणी मास्टरमाइंड हा शोधावाच लागेल अशी मागणीही त्यांनी केली
