लोकसभेत असे आहे संख्याबळ
१८व्या लोकसभेत कोणाला किती जागा
नवी दिल्ली
लोकसभा निवडणूक २०२४चा निकाल जाहीर झाला. देशात तिसऱ्यांदा भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएचे सरकार स्थापन होणार असले तरी २०१९च्या तुलनेत या लोकसभेत विरोधी पक्षांची ताकद वाढलेली आहे देशातील जनतेने पुन्हा एकदा भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए आघाडीला कौल दिला असला तरी या विजयात भाजपला मोठा धक्का बसला आहे. निवडणुकीत गेल्या १० वर्षातील कामाच्या जोरावर ३७० जागा मागणाऱ्या भाजपला २५० जागा देखील मिळाल्या नाही. त्यामुळे तिसऱ्यांदा सरकार स्थापन करताना त्यांना मित्र पक्षांची मदत घ्यावी लागले आणि सरकारमध्ये त्यांना महत्त्वाचे स्थान देखील द्यावे लागले. निवडणुकीत ४४१ जागा लढवणाऱ्या भाजपला फक्त २४१ जागांवर विजय मिळवता आला. २०१९च्या निवडणुकीत त्यांना ३०३ जागा मिळाल्या होत्या, तर २०१४ मध्ये २८२ जागांवर त्यांनी बाजी मारली होती.
दुसऱ्या बाजूला विरोधकांच्या इंडिया आघाडीने अनपेक्षित असे यश मिळवले. इंडिया आघाडीतील सर्वात मोठा पक्ष असलेल्या काँग्रेसला ९९ जागांवर विजय मिळवता आलाय. २०१९ मध्ये काँग्रेसने ५२ जागा तर त्याआधी २०१४ साली ४४ जागा जिंकल्या होत्या.तिसऱ्या क्रमांकावर सर्वाधिक जागा जिंकणारा पक्ष समाजवादी पक्ष ठरला, त्यांना ३७ जागा मिळाल्या. अखिलेश यादव यांच्या नेतृत्वाखाली सपाने उत्तर प्रदेशमध्ये भाजपला रोखले. तृणमूल काँग्रेसने पश्चिम बंगालचा गड राखला त्यांना २९ जागा मिळाल्या. डीएमकेने २२, तेलगू देशमने १६, जनता दल युनायटेडने १२ शिवसेना उद्धव ठाकरे गटाने ९, शिवसेने शिंदे गटाने ७, राष्ट्रवादी काँग्रेस- शरदचंद्र पवार पक्षाने ८ जागांवर विजय मिळवला.
२०२४ लोकसभा निवडणुकीत कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या
पक्ष जिंकलेल्या जागा २०१९मधील जागा
भाजप २४१ ३०३
काँग्रेस ९९ ५२
सपा ३७ ०५
तृणमूल काँग्रेस २९ २२
डीएमके २२ २४
तेलगू देशम १६ ०३
जनता दल युनायटेड १२ १६
शिवसेना- उद्धव ठाकरे ०९ ००
शिवसेना- शिंदे ०७ १८
राष्ट्रवादी काँग्रेस- शरदचंद्र पवार ०८ ००
लोकसभा निवडणुकीच्या निकालात अनेक दिग्गज उमेदवारांना पराभवाचा धक्का बसला. यात केंद्रीय मंत्री स्मृती इराणी, रावसाहेब दानवे आदींचा समावेश आहे. भाजपला उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रात चांगली कामगिरी करता आली नसली तरी अनेक राज्यांत त्यांनी २०१९ सारखी कामगिरी केली आहे.
केरळमध्ये त्रिशूर मतदारसंघातून भाजपला विजय मिळाला. भाजपला पक्षाच्या स्थापनेनंतर केरळमध्ये मिळालेली ही पहिलीच जागा आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीला ३० तर महायुतीला १७ जागा मिळाल्या. एका जागेवर अपक्षाने बाजी मारली, हा उमेदवार काँग्रेसचा बंडखोर होता.
