ही परिवर्तनाची नांदी:राहुल
संविधान वाचविण्याच्या लढाईत गरिबांचे सर्वाधिक योगदान
नवी दिल्ली :
नरेंद्र मोदी आणि अमित शाह या जोडगोळीने देश चालवू नये, ही तमाम जनतेची इच्छा आहे, हे आजच्या निकालातून स्पष्ट झाले आहे. आजचा निकाल ही परिवर्तनाची नांदी आहे. आम्ही कोणत्याही एका पक्षाविरोधात निवडणूक लढलो नाही तर बेकायदा वागणाऱ्या संस्थांविरोधात आम्ही निवडणूक लढलो. आमची लढाई संविधान वाचविण्याची होती. दलित, मुस्लीम, आदिवासी आणि गोरगरीब लोकांनी संविधान वाचविण्याच्या लढाईत सर्वाधिक योगदान दिले आहे. देशाने मोदी-शाहांना नाकारल्यानंतर आम्ही इंडिया आघाडी म्हणून जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करू, असे सांगत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी इंडिया आघाडीच्या सरकार बनविण्याच्या हालचाली सुरू असल्याचे अप्रत्यक्ष संकेतच दिले.
राहुल म्हणाले, “मोदी-शाहा यांनी देश चालवू नये, ही जनतेची इच्छा आहे. आजच्या निकालातून तेच स्पष्ट झालेय. आम्ही कोणत्याही पक्षाविरोधात लढत नव्हतो तर संस्थांविरोधात आम्ही दोन हात करत होतो. संविधान वाचविण्याची आमची लढाई होती. देशाने आज परिवर्तनाच्या दिशेने महत्त्वाचं पाऊल टाकलेय”
