नितीशबाबू,चंद्राबाबू पुन्हा चर्चेत
दोघांच्या भूमिकेकडे साऱ्या देशाचे लक्ष
नवी दिल्ली
लोकसभा निवडणुकांचे निकाल जवळपास स्पष्ट झाले आहेत. भाजपनं केलेल्या दाव्याप्रमाणं त्यांना स्वबळावर एकहाती सत्ता मिळवता आलेली नाही. एनडीए आघाडीला मात्र बहुमताचा आकडा गाठता आला आहे. या निकालांमध्ये दोन पक्षांच्या कामगिरीनं सगळ्यांच्या नजरा त्यांच्याकडं वळल्या आहेत. हे दोन पक्ष म्हणजे चंद्राबाबू नायडू यांना तेलुगू देसम पार्टी आणि नितिश कुमारांचा जनता दल युनायटेड.
चंद्राबाबू नायडू यांच्या तेलुगू देसम पक्षाला (टीडीपी) लोकसभा निवडणुकीत 16 जागा आणि नितीश कुमारांच्या जेडीयूला 12 जागा मिळाल्या आहेत
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निकालानंतर चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांचा गौरव केला आहे निवडणूक पूर्व आघाडीचा विचार करता हे दोन्ही पक्ष भाजपच्या नेतृत्वातील एनडी आघाडीबरोबर होते. पण भाजपला स्वबळावर बहुमत मिळत नसल्याचं दिसू लागल्यानं या दोन्ही पक्षांकडं सगळ्यांच्या नजरा वळल्या आहेत.
चंद्राबाबू अनुभवी राजकारणी आहेत.अशा प्रसंगांमध्ये यापूर्वीही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. 1984 च्या निवडणुकीनंतरतर तेलगू देसम लोकसभेत प्रमुख विरोधी पक्ष होता. पंतप्रधान आणि राष्ट्रपती कोण हे ठरवल्याचे दावेही त्यांनी केले होते. आताही त्यांना तेच स्थान हवं आहे चंद्राबाबू यांनी यापूर्वी राजकीय बाजू बदलण्यासाठी आंध्रला विशेष दर्जा न मिळणं हे कारण दिलं होतं. त्यासाठीच त्यांनी भाजप सोडून काँग्रेसची साथ दिली. पण परत ते भाजपकडे का गेले हे मात्र स्पष्ट केलेलं नाही. राज्यात एक टक्काही मतं नसलेल्या पक्षाला लोकसभेच्या सहा आणि विधानसभेच्या दहा जागा देण्याचा त्यांचा निर्णय धक्कादायक मानला जातो
नितीश कुमार दोन दशकांपासून बिहारच्या राजकारणाचे केंद्रबिंदू राहिले आहेत. पण त्यांनी दशकभरात अनेकदा बाजू बदलल्याचं पाहायला मिळालं आहे.
भाजप, काँग्रेस, राजद अशा पक्षांबरोबर त्यांनी वेळोवेळी हात मिळवणी केली. तसंच ऐन वेळी त्यांनी पक्षांची साथ सोडल्याचंही पाहायला मिळालं. कोणत्याही प्रकारे सत्तेत राहण्याचा प्रयत्न त्यांनी केला. देशात विरोधकांची आघाडी असावी यासाठी त्यांनी स्वतः पुढाकार घेतला होता. पण नंतर तेच भाजबरोबर गेले. त्यामुळं नितीश कुमार एखादी भूमिका घेणार नाहीत, असं कोणीही ठामपणे सांगू शकत नाही.याच कारणामुळं अशाप्रकारची गणितं समोर येऊ लागल्यानं माध्यमांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा झाल्याचं पाहायला मिळालं.
