सलमानवरील आणखी एका हल्ल्याचा कट उघड
चौघांना अटक केल्याचा नवी मुंबई पोलिसांचा दावा
मुंबई
अभिनेता सलमान खानवर हल्ला करण्याचा आणखी एक कट समोर आणल्याचा दावा नवी मुंबई पोलिसांनी केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी चौघांना अटकही केली आहे.लॉरेन्स बिश्नोई टोळीतील 16-17 जणांनी फेब्रुवारी महिन्यात पनवेलमध्ये याबाबत रेकीदेखिल केली होती, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.सलमान खान पनवेलला जात असताना त्याच्यावर हल्ला करण्याचा हा कट रचण्यात आला होता, अशी माहिती नवी मुंबई पोलिसांनी शनिवारी दिली.
याप्रकरणी गेल्या आठवड्यात चार जणांना अटक करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं.सलमान खानच्या मुंबईतील वांद्रे येथील निवासस्थानावर गेल्या महिन्यात गोळीबार झाला होता.त्या प्रकरणात पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली होती. त्या दोघांपैकी एकानं कारागृहात आत्महत्या केली होती.
पोलिसांच्या मते, चित्रपट कलाकारांवर हल्ले करून मुंबईत खंडणी वसुली सुरू करण्याचा लॉरेन्स बिश्नोई गँगचा प्रयत्न आहे.
याबाबत उपायुक्त विवेक पानसरे यांनी माध्यमांना माहिती दिली.“आम्ही चार जणांना अटक केली आहे. आरोपी अनेक दिवसांपासून अभिनेत्यावर हल्ल्याचा कट रचत होते. रेकी करण्यासाठी आरोप पनवेलमध्ये राहिलेही होते,”असं ते म्हणाले
