हिंजवडीतील ३७ कंपन्यांचे स्थलांतर


आयटी इंजिनियर्सचा रोजगार धोक्यात

Advertisement

पुणे
आयटीनगरी म्हणून जागतिक नकाशावर प्रसिद्ध असणाऱ्या हिंजवडीतील राजीव गांधी माहिती तंत्रज्ञान नगरीतील ३७ कंपन्यांनी स्थलांतर केले आहे, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. रस्ते, वाहतूक, आयटी इंजिनियर्सला राहण्यायोग्य वातावरण उपलब्ध नसणे, आरोग्य आणि विविध नागरी सुविधांचा अभाव असल्याने कंपन्यांनी स्थलांतर केल्याचे हिंजवडी इंडस्ट्रियल असोसिएशनचे मत आहे.
पुण्यालगत असणाऱ्या हिंजवडी परिसरामध्ये सन १९९७ पासून आयटीनगरी उभारण्याचे काम सुरू झाले. तत्कालीन केंद्रीय माहिती आणि दूरसंचार मंत्री प्रमोद महाजन आणि राज्याचे उद्योगमंत्री पतंगराव कदम यांच्या हस्ते सन २००० मध्ये या नगरीचे उद्घाटन करण्यात आले होते. त्यानंतर हिंजवडी आयटीनगरी ही जागतिक नकाशावर ओळखली जात आहे. या ठिकाणी दीडशेहून अधिक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर कंपन्या आहेत. त्यामुळे देशभरातील लाखो आयटी इंजिनियर्सला रोजगार मिळालेला आहे. आयटीनगरी शेजारी असणाऱ्या भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर विकास झाला आहे.
हिंजवडी आयटीपार्कचा परिसर हा महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांच्या अखत्यारित येतो. आयटीनगरीत जाण्यासाठी पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरातून अभियंत्यांना वाहतूककोंडीचा मोठा त्रास करावा लागतो. त्याचबरोबर विविध समस्यांना आयटीयन्सला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे कंपन्यांच्या कामावर परिणाम होत आहे.आयटी इंजिनिअरचा वेळ आणि पैसा वाया जात आहे. त्यामुळे गेल्या चार वर्षांमध्ये परिसरातील ३७ कंपन्यांनी स्थलांतर केले आहे. त्यातील काही कंपन्या मगरपट्टा सिटी, चेन्नई, हैदराबाद अशा विविध भागांमध्ये स्थलांतरित झाले आहेत.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!