भारत अधिक तापणार


मे महिन्यासाठी हवामान विभागानं दिला इशारा
नवी दिल्ली
देशातील वातावरणात सातत्यानं बदल होत आहे. मे महिन्यात देशातील तापामानात वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.
मे महिन्यात देखील देशातील बहुतांश भागात तापमान सरासरीहून अधिक राहण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे. राज्यात देखील अनेक ठिकाणी मे महिन्यात उष्णतेच्या लाटा सरासरी दिवसांहून अधिक राहण्याचा अंदाज आहे.
कोकणातील तापमान मे महिन्यात सरासरीहून अधिक राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. साधारणपणे मे महिन्यात मराठवाडा आणि विदर्भात जवळपास 3 दिवस उष्णतेची लाट पाहायला मिळत असते.मराठवाडा आणि विदर्भात उष्णतेच्या लाटेच्या दिवसांची संख्या साधारण 5 ते 8 दिवसांपेक्षा जास्त राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
सध्या महाराष्ट्रात देखील तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. राज्यातील बहुतांश ठिकाणी तापमानाचा पारा हा 40 अंशाच्या पुढे गेला आहे. त्यामुळं नागरिकांच्या अंगाची काहीली होत आहे. त्यामुळं दुपारच्या वेळेस नागरिकांनी घराच्या बाहेर पडू नये असे आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात येत आहे. अनेक ठिकाणी उष्माघाताच्या घटना देखील घडत आहेत. त्यामुळं नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी असं आवाहन करण्यात येत आहे. कोकणाबरोबर आता खान्देश व नाशिक जिल्ह्याच्या घाटमाथ्यावरील 7 तालुके वगळता संपूर्ण पश्चिम-अर्ध महाराष्ट्रातील (मुंबईसह कोकण व नाशिक नगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर तसेच संपूर्ण मराठ वाडा)अश्या 22 जिल्ह्यात शनिवार दि.4 मे पर्यन्त उष्णतेच्या लाटेची शक्यता जाणवत असल्याची माहिती तज्ज्ञांनी दिली आहे. मुंबईसह संपूर्ण कोकणातील 7 जिल्ह्यात मात्र उष्णतेच्या लाटेबरोबर घाम काढणाऱ्या दमट वातावरणाचा ही ह्या 5 दिवसात सामना करावा लागेल, असे वाटते. महाराष्ट्रातील लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदाना दरम्यान मात्र (6 व 7 मे ला) कदाचित कमाल व किमान अश्या दोन्हीही तापमानात काहीशी घट होवून सध्याच्या वातावरणापासून काहीसा दिलासाही मिळू शकतो, असे वाटते. त्यामुळं पुढील पाच दिवस महाराष्ट्रातील नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी असं आवाहन करण्यात आलं आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!