आरक्षण संघर्षात पवारांनी लक्ष घालावे


छगन भुजबळ यांनी भेटीत केली विनंती

Advertisement

मुंबई
राज्यात मराठा विरूद्ध ओबीसी असा संघर्ष उभा राहिला आहे. हे योग्य नाही. यात शरद पवारांनी लक्ष घालावं, असं सुचवल्याचं छगन भुजबळांनी सांगितलं. या संघर्ष मिटवण्यासाठी गरज पडली तर काँग्रेसचे नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनाही भेटेन, असं छगन भुजबळ म्हणाले.
छगन भुजबळ यांनी आज शरद पवारांची भेट घेतली. मुंबईतील सिल्वर ओक या शरद पवारांच्या घरी जात छगन भुजबळ यांनी तासभर चर्चा केली. या भेटीनंतर छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषद घेत शरद पवार यांच्यासोबतच्या बैठकीतील मुद्दे सांगितले.
मी तुम्हाला सांगतो, हा प्रश्न सोडवावा सुटावा, ओबीसी आणि मराठ्यांचा. तंग झालेलं वातावरण सुटावं यासाठी माझा प्रयत्न आहे. त्यासाठी मी कुणालाही भेटायला तयार आहे. उद्या मला वाटलं की राहुल गांधींना भेटलं पाहिजे. किंवा पंतप्रधानांना भेटलं पाहिजे तर त्यांनाही भेटेल. कारण राज्यातील वातावरण शांत असलं पाहिजे,गोरगरीबांची घरे पेटता कामा नये. एकमेकांच्या जीवावर कुणी उठता कामा नये, असंही भुजबळांनी यावेळी स्पष्ट केलं आहे.
राज्यात ओबीसींना आरक्षण देण्याचं काम तुम्ही राबवलं. आणि आता राज्यात काही जिल्ह्यात स्फोटक परिस्थिती निर्माण झाली आहे. काही लोक मराठा समाजाच्या हॉटेलात जात नाही. काही लोक ओबीसी, धनगर आणि वंजारी आणि माळी समाजाच्या दुकानात मराठा समाज जात नाही. अशी परिस्थिती झाली आहे. राज्यातील ज्येष्ठ नेते म्हणून तुमची जबाबदारी आहे, ही शांतता निर्माण झाली पाहिजे, अशी गरज छगन भुजबळ यांनी बोलून दाखवली.
मी आज शरद पवार साहेबांकडे सकाळीच गेलो होतो. त्यांची वेळ घेतली नव्हती. ते आजारी असल्याचं कळलं होतं. सव्वा दहा वाजता गेलो होतो. ते तब्येत बरी नसल्याने झोपले होते. त्यामुळे मी एक दीड तास थांबलो. ते उठले आणि मला बोलावलं. ते बिछान्यावरच झोपलेले होते. तब्येत बरी नव्हती. मी बाजूला खुर्ची ठेवून बोलत होतो. दीड तास चर्चा केली. मी कोणतंही राजकारण घेऊन आलो नाही. मंत्री आणि आमदार म्हणून आलो नाही. पक्षीय भूमिका नाही, असं यावेळी भुजबळांनी स्पष्ट केलं.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!