केजरीवाल तुरुंगात आंबे, मिठाई आणि बटाटे का खातात?
शुगर वाढावी म्हणून सेवन करत असल्याचा ईडीचा आरोप
नवी दिल्ली
आप या पक्षाचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मागच्या महिन्यात मद्य धोरण घोटाळा प्रकरणातअटक करण्यात आली आहे. केजरीवाल हे तिहार तुरुंगात आहेत. अरविंद केजरीवाल हे तुरुंगात मिठाई, आंबे यांचं सेवन मुद्दामहून शुगर वाढावी म्हणून करत आहेत अशी माहिती ईडीने कोर्टात दिली आहे.
या दरम्यान दिल्लीत राऊज एव्हेन्यू कोर्टात अरविंद केजरीवाल यांनी केलेल्या याचिकेवरच्या सुनावणीदरम्यान ईडीने त्यांच्यावर आरोप केले आहेत. विशेष म्हणजे न्यायालयाकडून जामीन मिळवण्यासाठी केजरीवाल यांच्याकडून खटाटोप केला जातो आहे असंही ईडीने म्हटलं आहे.अरविंद केजरीवाल तुरुंगात मिठाई, आंबे, साखर, बटाटे खात आहेत. त्यांना मधुमेहाचा त्रास आहे. तरीही त्यांची शुगर वाढावी म्हणून अरविंद केजरीवाल प्रयत्न करत आहेत. त्याद्वारे जामीन मिळवण्याचा प्रयत्न केजरीवाल करत आहेत असा आरोप ईडीने केला आहे. ईडीच्या आरोपानंतर न्यायलयाने अरविंद केजरीवाल यांचा डाएट चार्ट मागवला आहे.
अरविंद केजरीवाल यांना टाइप २ प्रकारचा मधुमेह आहे. अरविंद केजरीवाल जाणीवपूर्वक बटाटे, मिठाई, आंबे खात आहेत. जाणीवपूर्वक गोड पदार्थांचं सेवन करत आहेत. या सेवनामुळे त्यांची शुगर लेव्हल वाढेल आणि त्यांना जामीन मिळण्यास मदत होईल असा दावा ईडीने न्यायालयात केला आहे. तुरुंग प्रशासनाने आम्हाला अरविंद केजरीवाल यांचा डाएट प्लान दिला आहे. त्यामध्ये केजरीवा काय काय खातात याची माहिती आहे. आंबे, बटाटे, मिठाई हे गरजेपेक्षा जास्त खात आहेत हे सगळं ते मुद्दाम करत आहेत असाही आरोप ईडीने केला आहे. आता या प्रकरणी पुढच्या शुक्रवारी सुनावणी होणार आहे.
