सौ. निष्ठा वाळिंबे यांचे वृद्धापकाळाने निधन
सातारा
सातारा तालुक्यातील निवृत्त कृषी अधिकारी सुधीर वाळिंबे यांच्या पत्नी सौ. निष्ठा सुधीर वाळिंबे ऊर्फ ताई (वय ८०) यांचे वार्धक्यामुळे नुकतेच पुणे येथे निधन झाले. सातारा तालुक्यातील कुमठे (आसनगाव) या गावात आबालवृद्धांच्या प्रगतीसाठी त्यांनी चाळीस वर्षे काम केले होते.
स्वतः शहरी वातावरणात वाढलेल्या ताईंनी कुमठ्यातील मुलांसाठी विनामूल्य बालवाडी, संस्कारवर्ग, तसेच शिकवणी वर्ग हे उपक्रम राबविले.
मुलांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळावी यासाठी त्यांनी ग्रंथालय, व्यायाम आणि क्रीडासाधने उपलब्ध करून दिली. तसेच गावात पहिला प्रौढ साक्षरता वर्ग यशस्वीरित्या चालविण्यासाठी त्यांनी कष्ट घेतले. गावातील जवळपास चार पिढ्यांना या सर्व उपक्रमांचा लाभ मिळाला. या व्यतिरिक्त स्वतःच्या घरच्या शेतीचे वृक्षशेतीत रूपांतर करण्यात त्यांचे मोठे योगदान होते. ताईंच्या इच्छेनुसार त्यांच्या अस्थींचे विसर्जन या वृक्षशेतीत करण्यात येणार आहे.
त्यांच्या पश्चात त्यांचे पती निवृत्त कृषी अधिकारी सुधीर वाळिंबे आणि कन्या सध्या अमेरिकेत वास्तव्यास असलेल्या जेष्ठ वृत्त निवेदिका कौमुदी वाळींबे व इतर परिवार आहे.

