सायबर सुरक्षा अभियानात केबीपी मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांची निवड
सातारा
कर्मवीर भाऊराव पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च मधील बीसीए विभागातील विद्यार्थ्यांची क्विक हील फाउंडेशनच्या ‘सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा’ या राष्ट्रीय अभियानासाठी निवड झाली आहे. सायबर सजगता आणि डिजिटल सुरक्षितता यावर आधारित या अभियानासाठी विद्यार्थ्यांना पुण्यातील क्विक हील मुख्यालयात प्रशिक्षण व ओरिएंटेशन सत्रात सहभागी होण्याची संधी लाभली.
या अभियानात निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये प्रतिक जाधव (प्रेसिडेंट), जान्हवी चोरगे (सेक्रेटरी),आदित्य कांबळे (ऍक्टिव्हिटी डायरेक्टर),श्रद्धा कुंभार (मीडिया डायरेक्टर)यांचा समावेश असून, या विद्यार्थ्यांनी सायबर सुरक्षा, ऑनलाइन धोके, सोशल मीडियातील खबरदारी यावर सखोल माहिती घेतली. त्यांनी समाजात डिजिटल जागरूकता निर्माण करण्यासाठी विविध कल्पनांची देवाणघेवाण केली.
या उपक्रमात क्विक हील फाउंडेशनच्या चेअरपर्सन सौ. अनुपमा काटकर यांची विशेष उपस्थिती होती. अजय शिर्के व गायत्री केसकर-पवार यांनी विद्यार्थ्यांना अत्यंत प्रेरणादायी आणि मार्गदर्शक सत्रांद्वारे उत्तम माहिती दिली. त्यांच्या अनुभवातून विद्यार्थ्यांनी सायबर सुरक्षा विषयक अनेक महत्त्वाचे पैलू आत्मसात केले.
इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ. बी.एस. सावंत यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना सांगितले की, “अशा प्रकारचे प्रशिक्षण उपक्रम विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी उपयुक्त ठरतात.” तसेच विभाग प्रमुख डॉ. आर. डी. कुंभार यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.प्राध्यापिका प्रियांका लोखंडे यांनी शिक्षक समन्वयक म्हणून सहभाग घेतला.

