परिपूर्ण शिक्षण हीच आदर्श समाजाची गंगोत्री: क्षीरसागर
आदर्श शिक्षकांचा हिरकणी महोत्सवात सत्कार
सातारा
परिपूर्ण शिक्षण ही आदर्श समाजाची गंगोत्री आहे. सुसंस्कृत पिढी घडवण्यासाठी निरपेक्षपणे कार्य करणाऱ्या शिक्षकांचे योगदान अत्यंत मोलाचे असून शिक्षक समाजातील सर्वोच्च घटक आहे,” असे प्रतिपादन सांख्यिकी विस्तार अधिकारी यशेन्द्र क्षीरसागर यांनी केले.
येथील जिल्हा परिषद मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या हिरकणी महोत्सवात शिक्षण क्षेत्रात भरीव कार्य केलेल्या विविध शिक्षकांचा श्री.क्षीरसागर यांच्या हस्ते गौरव करण्यात आला .त्यावेळी व्यक्त केलेल्या मनोगतात ते बोलत होते.
श्री. क्षीरसागर यावेळी म्हणाले,” संवेदनशील नागरिक बनवणे हे शिक्षणाचे पहिले ध्येय आहे. साने गुरुजी ,सर्वपल्ली राधाकृष्णन, रवींद्रनाथ टागोर अशा महान शिक्षण तज्ञांची भारताला परंपरा आहे. आजच्या काळात विविध समस्यांना सामोरे जात असताना शिक्षण आणि प्रबोधन दर्जेदारपणे समाजाला मिळणे गरजेचे आहे. तरुण पिढीला शिक्षणातून आव्हानांना सामोरे जाण्याची ताकद मिळते.प्रयोगशील शिक्षक हे काम आज ताकदीने करत आहेत, ही खूप अभिमानाची आणि सकारात्मक बाजू आहे. शिक्षणात सगळीकडेच बाजार नाही.अनेक शिक्षक आणि शिक्षण संबंधित घटक समाजाला घडविण्याचे ,विद्यार्थ्यांना सुसंस्कृत करण्याचे कार्य प्रसिद्धीपासून दूर राहून मनापासून करीत आहेत .त्यांचा गौरव आज केला जात आ,हे ही खूप महत्त्वाची आणि सकारात्मक बाब आहे. हिरकणी महोत्सवात असा गौरव होणे हे या महोत्सवाचे बौद्धिक यश आहे. अशा गौरवामुळे शिक्षकांना मानसिक सशक्त पाठबळ मिळते आणि अधिक काम करण्यासाठी प्रोत्साहन मिळते.”
यावेळी जिल्हा परिषदेचे विविध कर्मचारी अधिकारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.