अर्थसंकल्प म्हणजे एक देश एक निवडणुकीची पूर्वतयारी
ज्येष्ठ अर्थतज्ञ चन्द्रशेखर टिळक यांचे प्रतिपादन
सातारा
” एक देश , एक निवडणूक ” या तत्त्वानुसार लोकसभेच्या व भाजप सरकार सत्तारूढ असलेल्या राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची पूर्व तयारी करावी अशा धाटणीचा २०२५-२६ वर्षासाठी अर्थसंकल्प मांडण्यात आल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ अर्थतज्ञ , सुप्रसिद्ध वक्ते आणि लेखक चन्द्रशेखर टिळक यांनी केले
सातारा नगर वाचनालय आणि सनदी लेखापाल संस्था सातारा शाखा या दोन संस्थांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या अर्थसंकल्प विश्लेषण या कार्यक्रमात ते प्रमुख वक्ता म्हणून बोलत होते.
नगर वाचनालयाच्या पाठक हॉलमध्ये झालेल्या व्याख्यानात बोलताना चन्द्रशेखर टिळक म्हणाले,कोणत्याही अर्थसंकल्पात निव्वळ अर्थकारण कधीच नसते. कारण मुळातच संकल्पना म्हणून अर्थसंकल्प हे राजकीय अर्थकारणाचे ( पॉलिटिकल इकॉनॉमी ) झळाळते उदाहरण असते. त्यामुळे अर्थसंकल्प हा अर्थकारण , समाजकारण , राजकारण यांचा मेळ असतो. हा अर्थसंकल्पही त्याला अपवाद नाही.राजकीय अर्थकारण आणि आर्थिक राजकारण याची अनेक उदाहरणे या अर्थसंकल्पात सापडतील
चन्द्रशेखर टिळक म्हणाले,भारतीय अर्थव्यवस्था मजबुत असल्याचे संकेत या अर्थसंकल्पाने दिले आहेत कृत्रिम बुद्धिमत्ता आणि लॉजिस्टिक या महत्वाच्या विषयांना प्राधान्य देण्यात आले आहे बिहार किंवा ईशान्येतील काही राज्यांचा प्रामुख्याने विचार कारण्यामागेही निश्चित धोरण आहे ज्याचा परिणाम आगामी काळात दिसेल
एका निश्चित भूमिका व पावित्र्यातून स्थानिक,राष्ट्रीय, जागतिक घटना व घटकांची दखल घेत हा अर्थसंकल्प सादर झाला आहे. लक्षात येणारी दुसरी गोष्ट म्हणजे ज्या गोष्टींचा स्पष्ट उल्लेख अर्थसंकल्पीय भाषणात झाला आहे त्यांचा विचार तर करावाच लागेल ; पण त्याचबरोबर ज्यांचा उल्लेख नाही त्याचाही विचार पार्श्वभूमी म्हणून या अर्थसंकल्पात आहे. तेल , संरक्षण , निर्गुंतवणूक , व्याजदर , महागाई , बेकारी असे अनेक घटक यादृष्टीने विचारात घ्यावे लागतील. यांचा सखोल विचार अनेक उदाहरणें देत टिळक यांनी आपल्या भाषणात केला
१२ लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर शून्य कर आकारणाच्या निर्णय घेणारा अर्थसंकल्प म्हणून केवळ या अर्थसंकल्पाचा उल्लेख करणे अन्यायकारक ठरेल कारण या अर्थसंकल्पात असे अनेक क्रांतिकारक निर्णय आहेत ज्याचे सकारात्मक परिणाम दिसणार आहेत असेही त्यांनी सांगितले
प्रारंभी चन्द्रशेखर टिळक,अजित कुबेर,अनंत जोशी,धीरज कासट,श्रीराम नानल,अतुल दोषी या मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले

कार्य्रक्रमाचे प्रास्ताविक डॉ राजेंद्र माने यांनी केले
धीरज कासट यांनी मनोगत व्यक्त केले
डॉ श्याम बडवे यांनी आभार मानले
रवींद्र झुटिंग यांनी सूत्रसंचालन केले
कार्यक्रमाला शिरीष चिटणीस,डॉ संदीप श्रोत्री,मुकुंद फडके,विनोद कुलकर्णी,प्रदीप कांबळे,प्रा श्रीधर साळुंखे आदी मान्यवर उपस्थित होते
फोटो ओळ
दीप प्रज्वलन करताना चंद्रशेखर टिळक शेजारी अजित कुबेर,अनंत जोशी,धीरज कासट,श्रीराम नानल,अतुल दोषी

