प्रवासी बोट समुद्रात बुडाली, तिघांचा मृत्यू


मुंबईत गेटवे ऑफ इंडियाजवळ दुर्घटना
मुंबई
मुंबईतील गेटवे ऑफ इंडियाजवळील समुद्रात एक प्रवासी बोट बुडाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातामध्ये तीन प्रवाश्यांचा मृत्यू झाला आहे. या बोटीमध्ये जवळपास 80 प्रवासी होते. त्यापैकी 77 जणांना वाचवण्यात यश आलं आहे. एकूण 130 जणांची क्षमता या बोटीची होती. सध्या या बोटीतील उर्वरित सर्व प्रवाश्यांचं बचावकार्य पूर्ण झालं आहे. तसेच जी स्पीड बोट या प्रवासी बोटीला धडकली ती नेव्हीची होती, असंही म्हटलं जातंय. या बोटीमध्ये लहान मुलं, अनेक कुटुंब होती.
प्राथमिक माहितीनुसार, ही नीलकमल नावाची फेरीबोट गेटवे ऑफ इंडियावरुन एलिफंटाच्या दिशेने जात होती. मात्र, समुद्रात गेल्यानंतर बोट अचानक बुडाली.
एक स्पीड बोट या बोटीच्या आजूबाजूला फिरत होती. याच बोटीने येऊन प्रवासी बोटीला धडक दिली होती. मुंबईपासून एलिफंटा हे जवळपास 30 किलोमीटरचं अंतर आहे. यासाठी 40 ते 45 मिनिटांचा प्रवास करावा लागतो. 3.30 च्या दरम्यान ही बोट गेटवे ऑफ इंडियावरुन सुटली. त्यानंतर 5 ते 8 किमी आतमध्ये ही बोट गेली होती. तेव्हाच एका स्पीड बोटने येऊन या बोटीला धडक दिली.
एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले , ‘मी साडेतीन वाजता ही बोट पकडली. 10 किलोमीटर आतमध्ये गेल्यानंतर एका स्पीडबोटने आमच्या बोटीला धडक दिली. त्यानंतर आमच्या बोटीत पाणी येऊ लागलं. त्यावेळी आमच्या ड्रायव्हरने आम्हाला लाईफ जॅकेट घालायला सांगितलं. मी वरुन खाली येऊन लाईव्ह जॅकेट घातलं तोपर्यंत बोटीत पाणी आलं. मी जवळपास 15 मिनिटं पोहत होतो. तोपर्यंत दुसरी बोट आली आणि आम्हाला वाचवले .
ज्या स्पीड बोटीने या बोटीला धडक दिली ती बोट नेव्हीची असल्याचं म्हटलं जातंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच ही बोट नेव्हीची असल्याचं म्हटलंय.
या अपघतावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही प्रतिक्रिया आता समोर आलेली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक्स पोस्ट करत म्हटलं की, ‘एलिफंटाकडे जाणाऱ्या नीलकमल या बोटीचा अपघात घडल्याचे वृत्त प्राप्त झाले. नौदल, कोस्टगार्ड, पोर्ट, पोलिस पथकच्या बोटी तातडीने मदतीसाठी रवाना करण्यात आल्या आहेत. जिल्हा आणि पोलिस प्रशासनाशी सातत्याने आम्ही संपर्कात असून, सुदैवाने बहुसंख्य नागरिकांना वाचविण्यात आले आहे. तथापि अजूनही बचावकार्य सुरू आहे. बचावकार्यासाठी सर्व त्या यंत्रणा तैनात करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला देण्यात आले आहेत.’
एलिफंटाला जाणाऱ्या फेरीबोटीच्या दुर्घटनेची माहिती मिळताच उपमुख्यमंत्री शिंदे यांनी रायगड जिल्हाधिकारी किसन जावळे, मुंबई शहर जिल्हाधिकारी संजय यादव यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून बचावकार्याची माहिती घेतली. त्याचबरोबर पोलिस उपआयुक्त (बंदरे) सुधाकर पाठारे यांच्याशीही दूरध्वनीवरून संवाद साधत माहिती घेतली. तसेच मुंबईत एलिफंटा परिसरात आज सायंकाळी प्रवासी बोट बुडाल्याची घटना घडली असून त्याबाबतच्या बचावकार्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई शहर, रायगड जिल्हाधिकाऱ्यांकडून घेतली. नौदल, जेएनपीटी, तटरक्षक दल आणि स्थानिक मच्छीमार बोटींच्या सहाय्याने बचाव कार्याला वेग देण्याचे निर्देश देत सगळ्यांना सुरक्षित बाहेर काढा, असे आदेश उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यंत्रणेला दिले आहेत.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!