थेट लढतींमध्ये महायुतीची सरशी


थेट लढतींमध्ये महायुतीची सरशी
वर्चस्वाची लढाई भाजप, शिंदे अजित पवारांनी जिंकली
मुंबई
राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेत फूट पडल्यानंतरच्या पहिल्याच विधानसभा लढतीत प्रभाव पाडण्यात शरद पवार आणि उद्धव ठाकरे अपयशी ठरले.
महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत 75 जागांवर भारतीय जनता पार्टीचा काँग्रेसशी थेट सामना होता. या जागांवर भाजपानं दणदणीत विजय मिळवला आहे.
थेट लढतीच्या 75 पैकी 64 जागांवर भाजपानं विजय मिळवला आहे तर काँग्रेसला फक्त 11 जागांवर विजय नोंदवता आला आहे. यातील 35 जागा विदर्भातील तर 12 जागा कोकण विभागातील होत्या.
या निवडणुकीतील काँग्रेसची कामगिरी इतकी घसरलेली होती की खुद्द काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना साकोली मतदारसंघात निसटता विजय मिळाला आहे.भाजपाच्या अविनाश ब्राह्मणकर यांच्याबरोबरच्या लढतीत नाना पटोलेंचा फक्त 0.08 टक्के मत फरकानं किंवा 208 मतांनी विजय झाला आहे.
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची 53 जागांवर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेशी थेट लढत होती. तिथे देखील शिंदेंच्या शिवेसेनेला जवळपास 70 टक्के म्हणजेच 37 जागांवर विजय मिळाला आहे.तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला फक्त 14 जागांवर विजय मिळवता आला आहे. या दोन्ही पक्षांमधील बहुतांश लढती कोकण विभागात (27) होत्या. तर 11 लढती मराठवाडा विभागात होत्या.
अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा 41 जागांवर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी थेट सामना होता.अजित पवारांच्या पक्षानं यातील 29 म्हणजे 70 टक्के जागा जिंकल्या आहेत. त्या तुलनेत थेट लढतींमध्ये शरद पवारांच्या पक्षाला फक्त 7 जागांवर विजय मिळाला आहे. यातील बहुतांश जागा पश्चिम महाराष्ट्रातील (16) होत्या. तर खान्देश आणि मराठवाड्यात प्रत्येकी 7 जागा होत्या.या दोन्ही पक्षांमधील अटीतटीची लढत असलेल्या जागांमध्ये पारनेरची जागा होती.तिथे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काशिनाथ महादू दाते यांचा 0.62 टक्के किंवा 1,526 मतांच्या फरकानं विजय झाला.तर कोपरगावमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं सर्वाधिक म्हणजे जवळपास 60 टक्के मतांच्या फरकानं विजय मिळवला.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!