एसटी कर्मचाऱ्यांचा मंगळवारपासून बेमुदत संप


आचारसंहितेआधी मागण्या मान्य करण्याचे आवाहन

Advertisement

मुंबई
एसटी कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा संपाचं हत्यार उपसलं आहे. एसटी कर्मचारी संघटनेने मंगळवारपासून राज्यभर बेमुदत आंदोलनाची हाक दिली आहे. आर्थिक बाबी, खासगीकरण अशा विविध मागण्या विधानसभेची आचारसंहिता लागण्याआधी मान्य करा अशी मागणीसंघटनांकडून करण्यात आली आहे.
या आंदोलनामुळे प्रवाशांची गैरसोय होण्याची शक्यता आहे.
एसटी एटी कर्मचारी संघटनांकडून तातडीने आर्थिक मुद्यांची सोडवणूक करावी यासाठी सोमवारी दि. 2 सप्टेंबर 2024 रोजी राज्यभर निदर्शने करण्यात आली. मुंबई सेंट्रल येथे कृती समितीच्या वतीने निदर्शने करण्यात आली. यावेळी द्वारसभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेतून सरकारला शेवटचा इशारा देण्यात आला आहे. सरकारने तातडीने मागण्या मान्य केल्या नाही तर 3 सप्टेंबरपासून राज्यभर बेमुदत संपाची घोषणा करण्यात आली आहे.
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच एसटी कर्मचाऱ्यांना वेतन मिळावे, प्रलंबीत महागाई भत्ता आणि फरक, वाढीव घरभाडे भत्ता आणि फरक, वेतनवाढीच्या दराचा फरक तसेच 4849 कोटी रुपयांमधील शिल्लक रकमेचे वाटप आणि नुकत्याच मुळ वेतनात जाहीर केलेल्या 5000, 4000 आणि 2500 रुपयांऐवजी सरसकट 5000 रुपये हजार मिळावेत अशा मागण्या एसटी कर्मचाऱ्यांकडून करण्यात आल्या आहेत.
या सर्व मागण्या विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी मंजूर कराव्यात असे आवाहन एसटी कर्मचाऱ्यांकडून करण्यात आले आहे. या मागण्या मान्य न केल्यास मंगळवारपासून सर्व कर्मचारी बेमुदत संपावर जातील असा इशारा सरकारला देण्यात आला आहे. दरम्यान या संपामुळे एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सरकार या मागण्यांबाबत काय निर्णय घेणार याकडे आता एसटी कर्मचाऱ्यांसह राज्याचे लक्ष लागले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!