मुंबई,पणजी,चेन्नईला मोठा धोका
शहरांचा किमान १० टक्के भाग पाण्याखाली जाणार
मुंबई
हवामान बदलामुळे समुद्राच्या पातळीत सतत वाढ होत आहे. यामुळे समुद्रकिनाऱ्यावरील शहरे बुडण्याचा धोका निर्माण झाला आहे. अशातच आता मुंबईतील 10 टक्क्यांहून अधिक जमीन आणि पणजी आणि चेन्नईतील 10 टक्क्यांपर्यंत जमीन 2040 पर्यंत पाण्याखाली जाण्याचा धोका असल्याचा दावा एका नव्या संशोधनात करण्यात आला आहे.
बेंगळुरूस्थित थिंक टँक ‘सेंटर फॉर स्टडी ऑफ सायन्स, टेक्नॉलॉजी अँड पॉलिसी’ (सीएसटीईपी) ने आपल्या संशोधनात असे म्हटले आहे की, ‘वाढत्या समुद्र पातळीमुळे कोची, मंगळुरू, विशाखापट्टणम, उडुपी आणि पुरी येथील पाच टक्के जमीन पाण्याखाली जाऊ शकते.’गेल्या काही वर्षांपासून हवामान बदलामुळे बर्फ वितळत आहे. त्यामुळे समुद्रातील पाण्याच्या पातळीत सातत्याने वाढ होत आहे. यामुळे भारतातील किनाऱ्यावरील चेन्नई, मुंबई, तिरुअनंतपुरम, कोची, मंगळुरु, विशाखापट्टणम, कोझिकोड, हल्दिया, कन्याकुमारी, पणजी, पुरी, उडुपी, पारादीप, थुथुकुडी ही शहरे काही प्रमाणात पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे अशी माहिती या अहवालातून समोर आली आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार 1987 ते 2021 या कालावधीत मुंबईत समुद्राच्या पातळीत कमाल 4.440 सेमीने वाढ झाल्याचे समोर आले आहे. यानंतर, समुद्राची पातळी हल्दियामध्ये 2.726 सेमी, विशाखापट्टणममध्ये 2.381 सेमी, कोचीमध्ये 2.213 सेमी, पारादीपमध्ये 0.717 सेमी आणि चेन्नईमध्ये 0.679 सेमीने वाढली आहे. ही वाढ अशीच सुरु राहिल्यास सर्वात आधी मुंबईतील जमीन पाण्याखाली जाण्याचा धोका आहे अशी माहिती समोर आली आहे.
या अहवालानुसार मुंबईसह यानम आणि थुथुकुडीमध्ये 10 टक्क्यांहून अधिक जमीन पाण्याखाली जाण्याचा धोका आहे. तर पणजी आणि चेन्नईमध्ये 5-10 टक्के आणि कोची, मंगळुरू, विशाखापट्टणम, हल्दिया, उडुपी, पारादीप आणि पुरीमध्ये 1-5 टक्के जमीन 2040 पर्यंत समुद्राच्या पाण्याखाली जाऊ शकते. तसेच आतापर्यंत समुद्राच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने शेती, जंगले आणि जैवविविधतेला मोठा धोका निर्माण झाला आहे. यामुळे हवामान बदलाला जबाबदार असणाऱ्या घटकांवर काम करण्याची गरज निर्माण झाली आहे. असे न झाल्यास आगामी काही वर्षांमध्ये किनाऱ्यावरील शहरे पाण्याखाली जाण्याचा धोका आणखी वाढण्याची शक्यता आहे.
