‘त्या’ काँग्रेस आमदारांवर कारवाई होणार
पृथ्वीराज चव्हाण यांचा गंभीर इशारा
मुंबई
महाराष्ट्र विधान परिषदेच्या 11 जागांसाठी 12 जुलै रोजी मतदान आणि मतमोजणी पार पडली. 11 जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत महायुतीने 9 जागांवर विजय मिळवला तर महाविकास आघाडीला अवघ्या 2 जागांवर समाधान मानावे लागले.या निवडणुकीत महाविकास आघाडीला 3 जागा मिळण्याची शक्यता होती. मात्र काँग्रेसची काही मते फुटल्यामुळे शरद पवार गटाने पाठिंबा दिलेल्या शेतकरी कामगार पक्षाच्या जयंत पाटील यांना पराभवाचा सामना करावा लागला. यानंतर माजी मुख्यमंत्री आणि कॉंग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी विरोधात मतदान करणाऱ्या कॉंग्रेसच्या आमदारांवर कारवाईचा इशारा दिला आहे.
विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर एका वृत्तवाहिनीशी बोलताना पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले की, ‘आम्ही जी रणनीती ठरवली होती त्यानुसार आमचे 3 उमेदवार निवडून यायला हवे होते, पण आम्ही आकडेवारी पाहिल्यानंतर आमच्या लक्षात आले की काँग्रेसची मतं ही निश्चित फुटली आहेत. ज्या आमदारांनी महाविकास आघाडीला मत दिलं नाही, अशा काँग्रेस आमदारांची नावे आम्ही हाय कमांडला पाठवली आहेत. या आमदारांवर लवकरच हाय कमांडकडून कारवाई केली जाईल.’
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी या निकालाबाबत भाष्य करताना म्हटलं की, ‘विधान परिषद निवडणुकीवेळी आम्ही ट्रॅप लावला होता. या ट्रॅपमध्ये बदमाश लोकं सापडलेली आहेत. आम्ही वरिष्ठांना हे कळवलेलं आहे. लवकरच ज्यांनी पक्षविरोधी काम केलं, पक्षासोबत गद्दारी केली, अशा लोकांना बाहेरचा रस्ता दाखवला जाईल. काँग्रेस पक्ष लोकशाहीला मानणारा पक्ष आहे. काँग्रेस विश्वासावर देशभर काम करत आहे. त्या विश्वासावर आम्ही आमदार, खासदार निवडून आणतो. त्यामुळे आता गद्दारी करणाऱ्यांवर अशी कारवाई केली जाईल की पुन्हा कुणाची तसं कृत्य करण्याची हिंमत होणार नाही.’
या निवडणुकीतील विजयी उमेदवार आणि त्यांना मिळालेली मते
पंकजा मुंडे (भाजप) – 26 मते
परिणय फुके (भाजप) – 26 मते
अमित गोरखे (भाजप) – 26 मते
सदाभाऊ खोत (भाजप) – 23 मते
योगेश टिळेकर (भाजप) – 23 मते
कृपाल तुमाने (शिवसेना) – 25 मते
भावना गवळी (शिवसेना) – 24 मते
प्रज्ञा सातव (कॉंग्रेस) – 25 मते
शिवाजी गर्जे (राष्ट्रवादी) – 24 मते
राजेश विटेकर (राष्ट्रवादी) – 23 मते
मिलिंद नार्वेकर (ठाकरे गट) – 24 मते
