लिफ्टमध्ये फडणवीस,उद्धव ठाकरे एकत्र


चंद्रकांत पाटील यांनीही घेतली ठाकरे यांची भेट

मुंबई
विधानसभा अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी महाराष्ट्राच्या राजकारणात दोन मोठ्या घटना घडल्या आहेत. या घटनांचे अनेक राजकीय अर्थ काढले जात आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि भाजपचे राज्यातील सर्वात मोठे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानभवनात लिफ्टमधून एकत्र प्रवास केला.
यावेळी दोन्ही नेत्यांनी एकमेकांची विचारपूस केल्याचं सूत्रांनी सांगितलं. दुसरीकडे भाजपचे दुसरे महत्त्वाचे नेते चंद्रकांत पाटील यांनी स्वत:हून उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याने राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.
आजपासून राज्याचं पावसाळी अधिवेशन सुरू झालं आहे. अधिवेशनाला उपस्थित राहण्यासाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे आज विधानभवनात आले होते. उद्धव ठाकरे विधान भवनात येताच ठाकरे गटाच्या आमदारांनी त्यांचं जल्लोषात स्वागत केलं. यावेळी पेढे वाटण्यात आले. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्प हार अर्पण केला. त्यानंतर ते विधानभवनात जायला निघाले.

Advertisement


उद्धव ठाकरे हे विधान भवनात वरच्या मजल्यावर जाण्यासाठी लिफ्ट जवळ उभे होते. तिथे त्यांची अचानक उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी भेट झाली. यावेळी दोन्ही नेत्यांनी एकमेकांना नमस्कार केला. बातचीत केली. त्यानंतर दोन्ही नेते लिफ्टमध्ये शिरले. त्यांच्यासोबत मिलिंद नार्वेकरही होते. यावेळी या दोन्ही नेत्यांमध्ये संवाद झाल्याचं सांगितलं जातं. पण काय संवाद झाला यावर कुणीही भाष्य केलं नाही. परंतु, उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस हे एकत्र लिफ्टमधून गेल्याने त्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.
या घटनेनंतर आणखी एक महत्त्वाची घटना घडली. भाजपचे दुसरे मोठे नेते चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरे आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची भेट घेतली. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरे आणि दानवे यांना चॉकलेट दिलं. चंद्रकांत पाटील स्वत:हून उद्धव ठाकरे यांना भेटायला गेल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
दरम्यान, या दोन्ही नेत्यांच्या भेटीवर शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मला आज विधानभवनात सर्व आमदार भेटले. आम्ही गप्पा मारल्या. शेवटी आमच्यात मैत्रीचा धागा आहे भविष्यात महायुतीचेच दिवस असतील. महायुतीचंच सरकार येईल, असं संजय शिरसाट म्हणाले.
ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनीही या भेटीवर प्रतिक्रिया व्यक्त केली. आज सर्वांनी उद्धव ठाकरे यांचं स्वागत केलं. सर्वांना वाटतं उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री व्हावेत. उद्धव ठाकरे यांनी आधीही राज्याचं नेतृत्व केलं आहे, असं सांगतानाच फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची भेट होणं स्वाभाविक होणं, त्यांच्यात चर्चा होणं स्वाभाविक आहे. पण या भेटीत राजकीय चर्चा झाली नसेल. उद्धव ठाकरे यांचं नेतृत्व सर्व मानत आहेत. दोघच लिफ्टमधून गेले. पण सर्व चर्चा लोकांसमोर येत नाही. त्यांची सहज भेट झाली. त्यात नवीन काही नाही, असं वैभव नाईक म्हणाले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!