जयंत पाटील अध्यक्षपद सोडणार
नोव्हेंबरनंतर राष्ट्रवादीचा नवा प्रदेशाध्यक्ष कोण?
मुंबई
मी आणखी चार महिने राष्ट्रवादीचा प्रदेशाध्यक्ष असेन, नोव्हेंबरनंतर पदावर नसणार, असं सूचक वक्तव्य जयंत पाटील यांनी केलं आहे. अहमदनगर येथे झालेल्या पक्षाच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात बोलताना जयंत पाटलांनी हे वक्तव्य केलं आहे. तसेच, त्यांनी अजित पवार यांना अप्रत्यक्ष चिमटा देखील काढला आहे. माझे प्रदेशाध्यक्षपदाचे महिने मोजू नका, काही तक्रार असल्यास शरद पवार यांना सांगा. असं जयंत पाटील म्हणाले आहेत.
पक्षाच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात बोलताना जयंत पाटील म्हणाले की, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला राज्यात 80 टक्के जागा मिळाल्या त्यामुळे आमचा महाराष्ट्रातील प्रयोग यशस्वी झाला. लोकसभा निवडणुकीत संविधान बदलाबाबत प्रचार झाला आणि देशातील संविधान बदलता येऊ नये यासाठी भाजपच्या राज्यातील जागा कमी झाल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी नव्या चेहऱ्यांना संधी देईल राष्ट्रवादी किती जागा लढवणार याबाबत आम्ही मविआच्या बैठकीत निर्णय घेऊ
काही दिवसांपूर्वी बोलताना जयंत पाटील लवकरच भाजपात प्रवेश करतील, असं अमोल मिटकरी यांनी म्हटले होतं. त्यावर बोलताना त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे, अशी टीका पाटील यांनी मिटकरी यांच्यावर केली आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत ‘पिपाणी’ चिन्ह नसतं तर आमची साताऱ्याचीही एक जागा वाढली असती, असंही जयंत पाटील म्हणाले आहेत.
आता जंयत पाटलांनी प्रदेशाध्यक्ष पद सोडल्यानंतर पुढची धुरा कुणाच्या खांद्यावर सोपवली जाणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. यामध्येही शरद पवार भाकरी फिरवणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. त्यामुळे आता थोरल्या पवारांच्या राष्ट्रवादीचा नवा अध्यक्ष कोण? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे
