येत्या 6 महिन्यात मोठा राजकीय भूकंप
पंतप्रधान नरेंद्र मोदींची सर्वात मोठी भविष्यावाणी
नवी दिल्ली
लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर सहा महिन्यांतच देशाच्या राजकारणात मोठी उलथापालथ होईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या विधानामुळे विरोधकांनी देखील धसका घेतला आहे.
पंतप्रधान मोदींनी बंगालमध्ये बोलताना म्हटले की, बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे सरकार राज्याची लोकसंख्या बदलण्यात व्यस्त आहे. तुमचे एक मत देशाची राजकीय दिशा बदलेल. 4 जूननंतर येत्या 6 महिन्यात मोठा राजकीय भूकंप होणार आहे. घराणेशाहीच्या राजकारणावर अवलंबून असलेले अनेक राजकीय पक्ष आपसूकच कोसळतील.
काकद्वीप येथे एका सभेला संबोधित करताना पंतप्रधान मोदी यांनी ही भविष्यवाणी केली आहे. भाजपच्या उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी ते बंगालमध्ये पोहोचले होते. पीएम मोदी म्हणाले की, ममतांचं सरकार तुष्टीकरणाचं राजकारण करते, येथे संतांवर हल्ले होतात. याशिवाय केंद्रीय योजनाही बंद केल्या जात आहेत. बंगालमध्ये घुसखोरी झपाट्याने वाढत आहे.बंगालमधील तरुणांच्या हातून घुसखोर संधी हिसकावून घेत आहेत. ते तुमच्या जमिनी आणि मालमत्तांवर कब्जा करत आहेत. संपूर्ण देशात यामुळे चिंतेचे वातावरण आहे. सीमावर्ती भागातील लोकसंख्या वाढत आहे.
